इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळ हायकोर्टाने आजच्या तरुणाईच्या लग्नासंदर्भातील मत व्यक्त केले असून, त्याविषयी मोठी चर्चा सुरु झाली आहे. ‘आजची तरुण पिढी लग्न आणि पत्नीकडे वाईट दृष्टिकोनातून पाहते. कोणतीही जबाबदारी आणि कर्तव्य न करता मोकळे आयुष्य जगायचे असेल तर लग्न न केलेलेच बरे, असे त्यांना वाटते. पतीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती ए मुहम्मद मुश्ताक आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केलं आहे.
एका पतीने कोर्टात पत्नीविरोधात अर्ज दाखल केला होता. यात त्याने म्हटलं होतं की, पत्नी माझ्यासोबत वाईट वागते. सतत माझ्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेते. सोबतच मला तिनं मारहाण देखील केली आहे. मात्र हे आरोप पत्नीनं फेटाळले आहेत. याबाबत खंडपीठानं म्हटलं आहे की, जर पत्नीकडे संशय घेण्यासाठी ठोस कारण असेल तरच ती प्रश्न विचारते. आपलं दु:ख जाहीर करते. त्याला अबनॉर्मल बिहेवियर म्हटलं जाऊ शकत नाही. हा कुठल्याही पत्नीचं नॉर्मल वागणं आहे. याला क्रूरता म्हटलं जाऊ शकत नाही. याचा आधार घेऊन कुणी घटस्फोट घेऊ शकत नाही.
पूर्वी ‘WIFE’ चा शब्दाचा अर्थ ‘Wise Investment For Ever’ असा घेतला जात होता. आता तरूण पिढी याकडे ‘Worry Invited For Ever’ म्हणून पाहते. त्याबरोबरच ‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीमुळे विवाह आणि नातेसंबंध खराब झाले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कल्चरही त्यामुळे वाढत आहे. गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखले जाणारे केरळ हे कौटुंबिक नातेसंबंधांसाठी प्रसिद्ध होते. पण आजची पिढी स्वार्थीपणामुळे आणि विवाहबाह्य संबंधांमुळे नाती खराब करते. मुलांची काळजी घेत नाही. यामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झाली आहेत. समाजात भांडण करणाऱ्या जोडप्यांची, आई – वडिलांविना वाढणारी मुलांची आणि घटस्फोटित लोकांची संख्या वाढत आहे. यामुळे त्याचा समाजातील शांततेवरही परिणाम होत आहे, असंदेखील हायकोर्टाने म्हणलं आहे.
Kerala High court on New Young Generation wife and wedding Thoughts
Legal