जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साधारण तीन वर्षानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे जळगाव येथे गेल्या आठवड्यातच आगमनावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते. रेल्वेस्टेशनवर आणि दररोज त्यांच्या घरी भेटीसाठी हजारो लोक येत होते. अशातच काल रात्री दीडच्या सुमारास त्यांना श्वासोश्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. तात्काळ त्यांना डॉ.राहुल महाजन यांच्याकडे हलविण्यात आले. रात्रीपासून त्यांच्यासमवेत अशोक जैन, रमेश जैन, अनिल जैन अतुल जैन, रिषभ जैन व परिवारातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.
प्राथमिक सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर आज दुपारी चार वाजेपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखित आयसीयूमध्ये दादांवर उपचार झाल्यानंतर प्रकृतीत होत असलेली सुधारणा आणि भविष्याची काळजी म्हणून आज सायंकाळी त्यांना एअर ॲम्बुलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले. मुंबई येथील ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
त्यांच्यासोबत जळगावहून त्यांची मुलगी मीनाक्षी व मुलगा राजेश हे येथून सोबतच मुंबईला गेलेत आणि त्यांच्या सोबतच आहेत. सुरेशदादांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या परिवाराकडून कळविण्यात आलेले आहे.