पुणे – हौसेला काही मोल नसते, असे म्हणतात. पूर्वीच्या काळी काही राजे-महाराजे किंवा बादशहा – नबाब यांची हौस किंवा छंद तर खूपच आगळेवेगळे होते. आपल्या छंदासाठी ते हजारो नव्हे तर कोट्यवधी रुपये देखील खर्च करत असत. जुनागढच्या नवाबाला बद्दल देखील अशाच रंजक कथा सांगण्यात येतात.
आपल्या देशातील राजे, महाराजे, राजकुमार आणि नवाब केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या विचित्र छंदांसाठी प्रसिद्ध होते. या श्रीमंत लोकांचे छंद आणि त्यासाठी त्यांनी खर्च केलेला पैसा जाणून घेतल्यास, कोणीही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. काही राजांनी कचरा फेकण्यासाठी रोल्स रॉयस या शाही कारची खरेदी केली, तर काहींनी पेपरवेट म्हणून हिऱ्यांचा वापर केला. या अशाच शौकीनांपैकी एक म्हणजे जुनागढचे नवाब महाबत खान होय. महाबत खान यांचे कुत्र्यांवर विशेष प्रेम होते.
कुत्रे पाळण्याचे शौकीन जुनागढचे नवाब महाबत खान यांनी सुमारे ८०० कुत्री पाळली होती. एवढेच नाही तर या सर्व कुत्र्यांसाठी स्वतंत्र खोल्या असून देखरेखीसाठी नोकर आणि तातडीची दूरध्वनी व्यवस्था ठेवण्यात आली होती. जर एखाद्या कुत्र्याने आपला जीव गमावला तर त्याला सर्व विधींसह स्मशानभूमीत पुरले जाईल आणि अंत्ययात्रेबरोबर शोक संगीत वाजवले जाईल. त्यातही नवाब महाबत खान यांना या सर्व कुत्र्यांपैकी सर्वात जास्त आवडत होती, ती एका कुत्री. तिचे नाव रोशना होते. महाबत खान यांनी रोशनाचे लग्न बॉबी नावाच्या कुत्र्याशी लावण्याचे निश्चित केले. त्याकरिता नवाबांनी कोट्यावधीचा खर्च करून जय्यत तयारी केली होती.
नवाब महाबत खान यांच्या या छंदाचा उल्लेख प्रख्यात इतिहासकार डॉमिनिक लॅपिअर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात केला आहे. लग्नाच्या वेळी रोशनाला सोन्याचा हार, बांगड्या आणि महागडे कपडे घातले होते. एवढेच नाही तर गार्ड ऑफ ऑनरच्या पथकातील २५० कुत्र्यांनी लष्करी बँडसह या नव श्वान दाम्पत्याचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले. या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नवाब महाबत खान यांनी सर्व राजा-महाराजांसह व्हाइसरॉयला आमंत्रित केले होते. यावेळी राजा महाराजांसह अनेक श्रीमंत लोक आले होते, पण व्हाईसरॉयने येण्यास नकार दिला.
नवाब महाबत खान यांनी आयोजित केलेल्या या लग्नात दीड लाखाहून अधिक पाहुणे उपस्थित होते. या लग्नासाठी सुमारे २ कोटींपेक्षा जास्त खर्च झाला होता. या लग्नात खर्च झालेला पैसा जुनागढच्या तत्कालीन ६ लाख २० हजार लोकसंख्येच्या अनेक गरजा पूर्ण करू शकला असता. पण नबाबच तो त्याच्यापुढे कोणाचे काय चालणार?