इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बहुतांश वेळा असे म्हटले जाते की, ‘समाजात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब सिनेमा किंवा चित्रपटात उमटते.’ त्याचप्रमाणे चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या नानाविध दृश्यांचा समाज मनावर देखील चांगला – वाईट परिणाम घडत असतो, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्पेशल 26’ चित्रपट सिनेप्रेमींना नक्कीच आठवत असेल. अनेक व्यावसायिकांच्या घरावर सीबीआयच्या बनावट पथकाने छापा टाकला आणि त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सध्या देखील बिहारमध्ये असाच एक प्रकार घडला आहे.
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील एका वाळू व्यापाऱ्यासोबत खऱ्या आयुष्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. फरक एवढाच आहे की, चित्रपटात बनावट सीबीआयची टीम होती. तर प्रत्यक्ष बिहारमध्ये बनावट इन्कम टॅक्स विभागाचे ऑफिसर म्हणून काही जण आले आणि 25 लाखांची रोकड आणि 10 लाखांचे दागिने घेऊन पळून गेले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकारी म्हणून आलेल्या काही बदमाशांनी वाळू व्यापारी संजय सिंह यांची 35 लाख रुपयांची फसवणूक केली. चारचाकी वाहनातून आलेल्या पाच पुरुष आणि दोन महिलांनी बनावट आयकर अधिकारी असल्याचे भासवून वाळू व्यावसायिक संजय सिंग यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाखोंची रोकड आणि दागिने ताब्यत घेतले. या दरम्यान घरातील व्यक्तीने वाळू व्यावसायिक संजयला फोन केला असता ते घाईघाईत घरी पोहोचले. आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत बदमाशांनी त्याला चालकासह वाहनात बसवले. यानंतर चोरट्यांनी संजयला घरात कोंडून मुख्य गेट बाहेरून बंद करून वाहनासह पळ काढला.
वाटेत चोरट्यांनी सांगितले की, आम्ही आयकर कार्यालयात जातोय, तिथे तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल. जेव्हा प्राप्तिकर कार्यालयात जाण्यासाठी संजय घरातून बाहेर पडू लागले तेव्हा गेट बाहेरून बंद होते. यानंतर घराचे गेट उघडून, ते आयकर कार्यालयात पोहोचल्यावर तेथून कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संजय यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींचे रेकॉर्डिंग आपल्यासोबत नेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी भारतात हिंसाचाराच्या पार्श्वभूमी किंवा पटकथा असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्षित होत होते, त्या काळात समाजात हिंसाचाराचे प्रमाण वाढले, असे मत त्या काळातील समाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे अशा चित्रपटांवर बंदी घालावी, अशी मागणी देखील होत होती. विशेष म्हणजे चित्रपटातील हिरो किंवा अभिनेता ज्याप्रमाणे अभिनय करतो, स्टाईल मारतो किंवा एखादी चांगली -वाईट कृती करतो, त्याप्रमाणेच समकालीन तरुणाई देखील तशी कृती करण्यास प्रवृत्त होते, असे दिसून येते. पुण्यामध्ये सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी घडलेल्या एका खूनाच्या मालिकेची प्रेरणा गुन्हेगारांनी चित्रपटांमधून घेतली होती, असे त्याकाळी सांगण्यात येत असे.