सरसकट लाल मातीच वापरावी का?
मागील भागात आपण रोप कसं खड्ड्यांमध्ये रुजवायचं हे बघितलं. पण वृक्षारोपण करताना अजून काही गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. खड्डा, माती, पाणी यासंदर्भात अनेक गैरसमजही आहेत. पण, शास्त्रोक्त पद्धत नेमकी काय आहे हे जाणून घेतले तर वृक्षारोपणाचा आपल्या उद्देश १०० टक्के सफल होऊ शकतो.
बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की खड्डे केल्यानंतर तिथल्या खड्ड्यामध्ये गरज नसताना लाल माती थोड्या प्रमाणात टाकली जाते. आपण ज्या ठिकाणी खड्डे घेतो तिथलीच माती वापरण योग्य असते. वृक्षारोपण करताना त्यात काही कंपोस्ट खत, पालापाचोळा, सुकलेले शेण खत, आपल्या अवतीभोवतीच्या उपलब्ध असं पोषक तत्त्व त्या खड्ड्यामध्ये टाकायला हवे. त्यामुळे इतर ठिकाणावरुन लाल माती आणून टाकण्याची गरज नाही. ज्या ठिकाणावरून लाल माती येते त्या ठिकाणची परिस्थिती काय होत आहे, त्याचा आपल्याला विचार करणे गरजेचे आहे. त्या लालमाती उत्खननामुळे तिथली वनस्पती व पर्यावरणीय परिसंस्था आपण धोक्यात आणतो आहोत.
लाल माती वापर म्हणजे हा एक प्रकारचा काही लोकांचा बिझनेस आहे बाकी काही नाही. निसर्गाने त्या त्या वातावरणाच्या अनुसरूनच त्या त्या ठिकाणच्या मातीचा स्तर बनवला आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की, मुरमाड माती मध्ये रोपच येणार नाहीत. पण ओलावा टिकवून ठेवणाऱ्या, काळ्या, चिवट मातीपेक्षा, मुरमाड माती मध्ये योग्य संवर्धन केल्यास चांगल्या प्रकारे रोपांची वाढ होण्यास मदत होते. काळी माती काही ठिकाणी खूप चिवट असल्याकारणाने पावसाळ्यानंतर ती हिवाळ्यामध्ये सुकू लागते. त्यामुळे ती कडक होते. ज्याला आपण ढेकुळ म्हणतो. आणि अशा चिवट कडक झालेल्या मातीतून मुळांना पसरण्यास वेळ लागतो. मुळ त्याच्यामध्ये आवळली जातात. म्हणून असल्या मातीच्या ठिकाणी रोपांची वाढ ही जरा धिम्या गतीने होत असते.
जेव्हा पावसाळ्यानंतर माती सुकू लागते, अशा वेळेस काळी माती मोकळी ठेवण्यासाठी व रोपांच्या अवती-भोवती भेगा पडून मूळांवर ताण पडू लागतो. तसे होऊ नये यासाठी रोपांच्या अवती भवती साधारण दोन ते तीन फूट माती चार-पाच इंच खोदावी. तसेच माती मोकळी ठेवण्यासाठी तिथे वेळोवेळी रोपांना पाणी देण्याची गरज असते. असे केल्यास त्या मातीला तडे न पडता रोपांच्या भवती माती मोकळी राहते. मुरूम हा भुसभुशीत आणि मोकळा असतो. त्यामुळे अशा ठिकाणी रोपांना योग्य पाणी मिळालं तर त्यांची मूळं भुसभुशीतपणामुळे खोलवर पटकन जातात. रोप वाढण्यास चांगली मदत होते.
बर्याच लोकांना असा गैरसमज आहे की, मुरूम माती मध्ये रोप वाढणार नाहीत. रोप लावताना ज्या ठिकाणी आपण खड्डे करता, त्या उपलब्ध माती मध्येच, व्यवस्थित खत वगैरे टाकलं तर तिथे रोप चांगली वाढतात. फक्त काही ठिकाणी खडी सारखा मुरूम निघतो अशा ठिकाणी रोपांना सुरवातीस पोषक द्रव्य हे मिळत नसतात. अशावेळेस खड्डा करतांना नेहमीपेक्षा थोडा खोल घेऊन त्याच्यामध्ये गांडूळ खत किंवा कुजलेला पालापाचोळा, कंपोस्ट खत हे योग्य प्रमाणात खड्ड्यामध्ये भरायला हवे. अशा खड्ड्यात जर आपण रोप लावलं तर, सुरुवातीला रोप वाढीस लागण्यात मदत होते. आपण ज्या ठिकाणी रोप लागवड करतो, तेथील मातीचा पोत, वातावरण व परिसर लक्षात घेऊन, योग्य अशा प्रदेशनिष्ठ व देशी, वृक्ष प्रजातींची निवड, म्हणजेच योग्य ठिकाणी योग्य वृक्षांची लागवड केल्यास, आपल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. व खऱ्या अर्थाने वृक्षरोपणाचा उद्देश सफल होईल.