इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
गोष्ट एका वाटाड्याची : देरसू उजाला
देरसू हा खरं तर एक सर्वसामान्य वाटाड्या पण, कधी तो एखाद्या विक्षिप्त श्वापदासारखा वागतो तर कधी शिकारी असतो तर कधी भर जंगलात जीव वाचवणाऱ्या एखाद्या देवदूतासारखा भासतो. तैगाच्या जंगलात आदिवासी जमातीत जन्मलेला, निसर्गात वाढलेला, निसर्गाचा खडा न खडा माहित असलेला, निसर्ग हाच देव मानणारा निसर्गपुत्र देरसू उजाला.
देरसू खरंच अस्तित्वात होता की नाही माहित नाही परंतू, आपण जेव्हा एखाद्या जंगलात किंवा एखाद्या अनोळखी,दुर्गम ठिकाणी जातो तेव्हा त्यावेळी आपल्यासमोर भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कोणाला माहीत नसतं. अशावेळीसाच एक वाटाड्या आपल्याला तिथले स्थानिक वाटाडे एखाद्या देवदुताप्रमाणे भासतात. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपलं तिथे वावरणं मुश्किल होऊ शकतं. अनोळखी ठिकाणी अकस्मात येणारी संकटं, प्रतिकूल हवामान, चक्रावून टाकणाऱ्या भुलभुलैय्या पायवाटा, तसेच तिथल्या स्थानिक सुखसोयीची माहिती देण्यासाठी देरसू सारखे वाटाडे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पण ,ते कधी प्रकाशझोतात येत नाहीत. देरसू उजाला हा असाच एक वाटाड्या. कॅप्टन ब्लादिमीर आर्सेनिव्ह यांनी त्यांच्या खडतर प्रवासामधील सत्य घटनांच्या आठवणीवर लिहिलेल्या ‘देरसू उजाला’ या पुस्तकामुळे तो लोकांना माहिती झाला. 1902 साली ब्लादिमीर आर्सेनिव्ह या संशोधकावर सैबेरियाच्या जगप्रसिद्ध तैगा जंगलातील उसुरीया या अत्यंत दुर्गम आणि निर्मनुष्य असलेल्या अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सोबत सैबेरियन रायफल्सची तुकडी,सामान वाहतुकीसाठी खेचरं आणि घोड्यांची सोय करण्यात आली होती. वादळ आणि बर्फाच्या वजनाने पडलेल्या महाकाय झाडांमुळे या जंगलातून प्रवास करणे अत्यंत कष्टप्रद होते. अस्ताव्यस्त पसरलेल्या मोठमोठ्या शिळा,उखडून पडलेल्या झाडांचे अवाढव्य बुंधे, त्यावर पसरलेलं दाट, मातकट शेवाळ. एखाद्या भयपटाची आठवण होईल असा हा नजारा. सुरुवातीला वाटाड्या म्हणून आरसेनिव्हच्या आयुष्यात आलेला परंतु, पुढे जाऊन त्याच्या आयुष्याचा एक हिस्सा म्हणून राहिलेल्या देरसूची ही कथा. पुढे जाऊन 1975 साली या पुस्तकावर जगातील सर्वोत्कृष्ट दहा दिग्दर्शकांपैकी एक गणल्या जाणाऱ्या अकिरा कुरोसावा यांनी ‘ देरसू उजाला’ या चित्रपटाची निर्मिती केली. विचित्र दिसणारा, विक्षिप्त सवयींचा, वेंधळा, अजागळ असा हा देरसू. परंतू, त्याचं निसर्ग या विषयावरचं ज्ञान आपल्याला आश्चर्यचकित करणार असतं. तो निसर्गाशी सतत संवाद करतो. त्यामुळे तो जंगलात एकटा असूनही कधी एकटा नसतो.
आर्सेनिव्ह यांना तो ध्यानीमनी नसताना अचानक भेटतो आणि त्यानंतर हा वाटाड्या त्यांच्या सर्वात जिव्हाळ्याचा होतो. संपूर्ण प्रवासात त्यांच्यात निखळ, पारदर्शी अशी निस्वार्थ मैत्री होते. हे पुस्तक वाचताना किंवा चित्रपट पाहताना प्रत्येकवेळी देरसू ही व्यक्तिरेखा आपल्याला नव्याने उलगडत जाते, जास्तीत जास्त आवडायला लागते. कसा असेल हा देरसू ? असं आपलं कुतूहल चाळवत राहते.
कॅप्टन आर्सेनिव्हच्या या संपूर्ण प्रवासात निसर्गाची जशी त्यांना रमणीय, सुंदर अनुभूती येते तशीच वेळोवेळी त्याचं रौद्ररूपही त्यांना पाहायला मिळालं. जंगल, डोंगर, दऱ्या, नद्या, ऊन, वारा, पाऊस या सगळ्याचा अद्भुत अनुभव मिळाला. परंतू, जेव्हा जेव्हा या दुर्गम प्रवासात एखादं संकट समोर उभं रहात असे,त्यावेळी प्रत्येक कठीण समयी देरसू त्यांच्यासाठी भक्कम आधार म्हणून उभा राहत असे . जंगल हेच देरसूचं विश्व. निसर्गातली पंचमहाभूतं त्याचे सोबती. निसर्ग हाच त्याचा देव.
देवीच्या साथीत देरसूने आपल्या बायको मुलांना गमावलेलं असतं. देरसूचा जन्म एका आदिवासी जमातीत झाला होता. तो फक्त जंगलात भटकंती करतो, मिळेल ते नैसर्गिक खातो, जनावरांच्या लोकरीची कातडी मिळवतो आणि ती अंगावर घालून आनंदाने फिरत असतो. आर्सेनिव्हने विचारल्याबरोबर तो आनंदाने त्याचा मार्गदर्शक बनतो. त्याला जंगलाचं प्रचंड ज्ञान असतं. आर्सेनिव्ह च्या संपूर्ण प्रवासात येणाऱ्या अनेक थरारक प्रसंगांमध्ये देरसू कॅप्टनला त्यातून सहज बाहेर काढतो. जंगलातलं झाडाचं एखादं पानदेखील कदाचित त्याच्या परवानगीने पडत नसावं, इतकी त्याला जंगलाची खडा न खडा माहिती असते. निसर्गात होणारे सूक्ष्म बदल त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. पुढच्या काही क्षणात मुसळधार पाऊस होणार किंवा वादळ,वारा,हिमवर्षाव यांसारखं संकट येऊ शकतं, याचा तो अचूक अंदाज देतो. त्याच्यावर निसर्गदेवतेचा वरदहस्त आहे. त्याला अचूक नेमबाजी येते. जंगलातल्या दरोडेखोरखोरांशी सामना कसा करायचा याचं ज्ञान त्याला आहे. नुसत्या वासावरून कोणता प्राणी कुठल्या दिशेला आहे हे ओळखणारा हा देरसू सर्वसामान्य माणसाला थक्क करून सोडतो.
शेवटी निसर्ग आपल्याला काय शिकवतो? अहंकार दूर ठेवा.मोह, मद,मत्सर, दंभ या विकारांपासून निसर्ग खूप खूप दूर असतो. निसर्गामध्ये स्व ला विलीन केल्यानंतर निसर्गाची भव्यता आपल्या क्षुल्लक अस्तित्वाला झाकोळून टाकते आणि मग जाणवतं की, या सृष्टीच्या भव्यतेपुढे आपलं अस्तित्व किती नगण्य आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, स्वतःकडे काहीही न ठेवता.कोणत्याही प्रकारच्या परतीची अपेक्षा न करता. देरसूसारखे लोक खरे निसर्ग यात्री आहेत. कोणत्याही प्रकारचा लोभ नाही. मत्सर नाही. हेवा नाही. संचय करण्याची वृत्ती नाही. कधीही जास्तकाळ एका ठिकाणी न राहणारा देरसू ज्या ठिकाणी तो रहात असे, त्या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या वाटसरुंसाठी खायला थोडेफार तांदूळ,मीठ असे जिन्नस एखादया कोनाड्यात ठेवून जात असे. स्वतः कडे काहीही नसताना, एवढा मोठा परोपकारी विचार त्याच्याकडे असतो. त्याचं जसं माणसांवर प्रेम आहे तसेच निसर्गाच्या प्रत्येक घटकावर प्रेम आहे.
जेवण झाल्यानंतर अर्धवट खाल्लेले मटणाचे तुकडे जाळून न टाकता तो ते तुकडे किडे,पक्षी, प्राणी यांच्यासाठी बाजूला काढून ठेवत असे. त्याला पैशाचा कधीच मोह नव्हता, अपेक्षा नव्हती. पैशांनी काही खरेदी करायचं असतं हे त्या निस्वार्थ बुद्धीला माहीतच नव्हते. कारण अत्यंत सीमित गरजा. जेव्हा आर्सेनिव्ह त्याच्या वाटाड्याच्या कामाबद्दल त्याला पैसे देऊ करतो, तेव्हा तो पैशांच्या बदल्यात फक्त बंदुकीच्या गोळ्या मागतो, ते पण केवळ शिकारीसाठी,जगण्यासाठी. आर्सेनिव्हबरोबरच्या खडतर प्रवासात गोठलेल्या तळ्यावर भयाण वाऱ्यात, प्रचंड वेगात वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात जेव्हा अचानक सैबेरियन वाघ समोर येतो तेव्हा, ध्यानीमनी नसताना देरसू त्याच्यावर गोळी झाडून आपल्या लाडक्या कॅप्टनचे प्राण वाचवतो पण, त्याला त्याचा नंतर प्रचंड पश्चाताप होतो. अंबा म्हणजे वाघ. त्याला देरसू जंगलाचा स्वामी मानतो आणि आता आपल्यावरती वनदेवता कोपेल की काय अशी त्याला भीती वाटते.
कॅप्टन त्याला आपल्या सोबत शहरात आणतो पण, देरसूचा जन्म हा फक्त जंगलासाठीच होता. त्यामुळे शहरातलं त्याचं मन मारून जगणं कॅप्टनला बघवत नाही आणि तो त्याला परत जंगलात जायची परवानगी देतो. जंगलाचे कायदेकानून माहिती असणारे, जंगलाशी नाळ जुळलेले असे अनेक देरसू आपल्याला ठायी ठायी जंगलात दिसत असतात. देरसू उजाला हा खरंतर या जंगलातल्या वाटाड्यांचा एक प्रतिनिधी म्हणावं लागेल.देरसू म्हणजे खराखुरा निसर्गयात्री. असे अनेक स्थानिक जंगलवासी आपल्याला निसर्गात, जंगलात फिरताना मदत करत असतात, मार्ग दाखवत असतात, तिथले नियम सांगत असतात, तिथला इतिहास, चालीरीती प्रथा उलगडून दाखवत असतात. त्यांच्याशिवाय निसर्ग जवळून बघणं, अनुभवणं कदापि शक्य झालं नसतं, कारण ही मंडळी रोजच्या रोज तो निसर्ग जगत असतात.निसर्गाचे रक्षण करतात.निसर्गातली खडा न खडा माहिती ठेवतात. जंगल हेच त्यांचं विश्व असतं. देरसूसारखे अत्यंत साधे, अकृत्रिम प्रेम व अकृत्रिम मैत्री करणारे लोक हळूहळू लोक पावत आहेत. त्यामुळे देरसूसारखे प्रामाणिक, निस्वार्थी वाटाडे मात्र नक्कीच हूरहूर लावून जातात.
Column Nisarga Yatri Desrsu Ujala by Smita Saindankar