इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
नर्मदा परिक्रमेचा महाराष्ट्रातील प्रवास
नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण यात्रेची तयारी व पहिल्या तीन दिवसांचा दैनंदिन कार्यक्रम हे गेल्या लेखात आपण जाणून घेतले. आता आपण ओंकारेश्वर सोडून पुढील प्रवासास सुरुवात करणार आहोत. चला तर मग करु या भाविकांची उत्कंठा वाढवणार्या या यात्रेत चौथ्या दिवसापासून पुढील प्रवास…..
दिवस-४ – ओंकारेश्वर ते बडवानी
ओंकारेश्वर ते बडवानी हे अंतर सुमारे १५१ किलोमीटर असून या प्रवासास साधारण सहा/सात तास लागतात. याप्रवासात मोरटक्का-टोकसर-रावेरखेडी-बकावा-भट्यान-अमलथा-खलघाट ही गावे लागतात. मुक्कामी आपण बडवानी येथे पोहचतो. बडवानी येथे प्राथमिक सुविधा असलेली व राहण्यायोग्य हाॅटेल्स आहेत. भाविक बडवानी येथे राजघाट व एकमुखी दत्त मंदिरास अवश्य भेट देतात. सायंकाळी नर्मदा मातेची आरती व भोजन आटोपून आराम करणे असा कार्यक्रम असतो. या प्रवासात आपण रावेरखेडी येथे मराठा सरदार बाजीराव पेशवे यांच्या समाधीस भेट देतो. बाजीराव पेशवे यांचा शेवटचा काळ येथेच व्यतीत झाला. त्यामुळे रावेरखेडी गावास विशेष महत्व आहे.
दिवस-५ – बडवानी ते शहादा/प्रकाशा
बडवानी पासून शहादा हे अंतर ११० किमी आहे. पाचव्या दिवशी परिक्रमावासिय सकाळी नाष्टा करुन पुढील प्रवासास निघतात. पलसुद-निवाली-पानमसेल व ब्राम्हणपुरी करत शहादा येथे पोहचतो. पाचवा मुक्काम प्रवासी संस्था शहादा किंवा प्रकाशा यापैकी त्यांना सोयिस्कर होईल, अशा गावी करतात. ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्रात येतात. प्रकाशा हे धार्मिक स्थान आहे. येथे तापी-पुलिंदा व गोमती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तसेच प्रकाशा गावास दक्षिण काशी असेही म्हणतात. कारण येथे केदारेश्वर व संगमेश्वर ही पुरातन मंदिरे आहेत. याठिकाणी आपण नर्मदा नदीपासून थोडे दूर जातो. कारण नर्मदा नदीच्या आसपास मोठी गावे नाहीत. हा तोरणमाळचा परिसर डोंगराळ असल्याने राहण्याची सोय नाही. म्हणून हाॅटेल्ससाठी प्रकाशा अथवा शहादा येथे भाविकांची सोय केली जाते.
दिवस -६ -शहादा ते अंकलेश्वर
शहादा ते अंकलेश्वर हे अंतर १७५ किमी असून या प्रवासात ६/७ तास लागतात. या प्रवासात आपण खापेर-सागबारा-डेडीयापाडा-वालिया ही गावे लागतात. सायंकाळी नर्मदा आरती व भोजनाचा कार्यक्रम असतो. अंकलेश्वर हे या प्रवासातील मोठे शहर आहे. प्रवासात आपण सागबारा ओलांडतो तेंव्हा आपण गुजरात राज्यात प्रवेश करतो.
अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा आपण तीन राज्यांच्या सीमा ओलांडून प्रवास करतो तेंव्हा येथे बदलत जाणारी संस्कृती पहावयास मिळते.
आतापर्यंतचा हा प्रवास तसा बर्यापैकी अदिवासी भागातून होत असल्याने येथे विकास अजून पोहचला नाही. त्यामुळे रस्ते फारसे चांगले नाहीत व शहरी लोकांना ज्या भौतिक सुविधा लागतात त्या याभागात फारशा उपलब्ध नाहीत. मात्र गरीब अदिवासी व शेतकरी यांचे प्रेम जागोजागी अनुभवयास मिळते. यानंतरचा पुढील प्रवास हा गुजरात राज्यातून व काही प्रमाणात शहरी भागातून असल्याने प्रवास थोडा व्यवस्थित होतो. मात्र याबाबत आपण पुढील भागात माहिती घेऊ.
(क्रमशः)