इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
तीन दिवसांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नमस्कार ,
आपल्या नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेसंबंधी सविस्तर माहितीपूर्ण लेखमालेस आपण उदंड प्रतिसाद देऊन सोशल मिडीया मार्फत हा पुण्य ठेवा जगभर पोहचवला. त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. यापूर्वीच्या भागात आपण वाहनाने करावयाच्या नर्मदा परिक्रमेबाबत सविस्तर माहिती घेतली. आज आपण तीन दिवसांची उत्तरवाहिनी परिक्रमा कशी करावी, कुणी करावी, केव्हा करावी याबाबत माहिती घेणार आहोत.
खरंतर प्रत्येक हिंदू धर्मीयाने नर्मदा परिक्रमा ऐकदा तरी करावीच, असे म्हटलं जाते. परंतु शारिरीक दृष्टीने अथवा वेळेची अडचण असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनात एकदा तरी उत्तरवाहिनी नर्मदा परीक्रमा भक्तीभावाने करावी. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा साधारणे तीन दिवसात करावयाची असते. अनेक भाविक ही परीक्रमा चैत्र महिन्यात करतात. सर्वसाधारणपणे सर्व नद्या या उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहतात. पण ज्याठिकाणी नदीचा प्रवाह उलटा म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो, अशा भागातील नदीच्या प्रवाहास जास्त पवित्र मानले गेले आहे. अशा ठिकाणची नदी पुजा, परिक्रमा, स्नान आदी हे अधिक पुण्यदायी मानले जाते.
तीन दिवसांची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास संपुर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळते, असा नर्मदा पुराणात उल्लेख आहे. काशी येथेही गंगा नदी काही भागात उत्तर वाहिनी आहे तेथे मोठ्या प्रमाणावर पुजा-विधी होतात. भाविक स्नान करतात. गुजरात येथील बडोद्या जवळच्या गरुडेश्वर परिसरात उत्तरवाहिनी नर्मदा परीक्रमा केली जाते. तीन दिवसांच्या नर्मदा परिक्रमेची सुरुवात राजपिपला या गावाजवळील रामपुरा येथून केली जाते. तीन दिवसांची ही परीक्रमा साधारणपणे २१ किलोमीटर आहे.
शारीरीकदृष्ट्या व्यवस्थित असलेली कुठलीही व्यक्ती ही परिक्रमा सहज करु शकते. यासाठी गरज आहे ती फक्त दृढनिश्चय व सर्मपणाची. संपुर्ण परिक्रमेप्रमाणेच पहिल्या दिवशी स्नान करुन पुजा केली जाते. तसेच परिक्रमासाठीचा संकल्प करुन ब्राम्हण भोजन व कन्यापूजन करतात. दुसर्या दिवशी सकाळी रामपुरा येथून परिक्रमा सुरु करुन मंगरोल मार्गे गुवार पर्यंत पायी प्रवास करावा लागतो. हा संपुर्ण प्रवास नर्मदा नदीच्या दक्षिण तटाने केला जातो. गुवार येथे बोटीने नदी ओलांडून आपण तिलकवाडा येथे उत्तर तटावर पोहचतो. त्यानंतर मणि नागेश्वर, कपिलेश्वर, वासन मार्ग पायी प्रवास करुन आपण रेंगण येथे पोहचतो. तेथून परत बोटीने प्रवास करुन रामपुरा येथे पोहचलो की उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पुर्ण होते. परिक्रमा पुर्ण झाल्यावर संकल्प सोडून भंडारा व नर्मदा आरती करुन यात्रा पुर्ण होते. या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेस हजारो वर्षांची परंपरा आहे. ही परिक्रमा सहज व कमी वेळेत होणारी असल्याने प्रत्येकाने ही करावी, असे मानले जाते. यानंतर आपण ११० दिवसांची तसेच अत्यंत खडतर व क्षणोक्षणी भक्तांची परीक्षा घेणारी पायी नर्मदा परीक्रमा कशी करावी याबाबत माहिती घेऊ….
नर्मदे हर