इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – हरित कुंभचा कृती आराखडा
मागच्या लेखात आपण बघितलं की हरित कुंभ मेळ्याचे बीजारोपण कसे झाले आज आपण त्या हरित कुंभ मेळ्यात आपण काय केले याचा आढावा घेणार आहोत. त्यात महत्त्वाचा वाटा होता तो कृती आराखड्याचा…
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यावेळेला आपण विविध मंचावर समाजातील सर्व घटकांना एकत्र करून समुद्राइतके खोल विचारमंथन केले. निसर्गासाठी, गोदावरीसाठी चांगले काय आणि वाईट काय याचा आढावा घेतला गेला. त्यानुसार एक कृती आराखडा तयार करण्यात आला. तत्कालिन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना या विषयासाठी एकत्र आणले. एक वर्षासाठी कृती आराखडा बनवण्यात आला. जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषद कार्यकरी अधिकारी सुखदेव बनकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकरी रवी आंधळे आदी तसेच तज्ज्ञ म्हणून निरी संस्था, सर्व आखाडे, शाळा, विद्यालये, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कारखाने आदींंना या आराखड्यात सामावून घेण्यात आले. तसेच हा आराखडा सर्वंकष असा होता. या आराखड्यानुसार हाती घेण्यात आलेले महत्वाचे उपक्रम असे
स्वच्छता
समाजातील सर्व घटक एकत्र येतील. जवळपास 40 ते 50 हजार जण एकाच दिवशी गोदावरी, नंदिनी, वाघाडी, कपिला, अहिल्या, दारणा, वालदेवी आदी नद्यांमध्ये उतरले. भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे आयुक्त एकनाथ डवले साहेब हे त्यांच्या पत्नीसह मोहिमेत सहभागी झाले. नंदिनी नदीत अतिशय घाणीच्या ठिकाणी डवले साहेब व टीमने स्वच्छता केली. जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह हे टाळकुटेश्वर परिसरात, डॉ. प्रवीण गेडाम हे सिटी सेंटर मॉल जवळ नंदिनी नदीच्या स्वच्छतेत सक्रीय झाले. पोलिस आयुक्त एस जगन्नाथन, हरिश बैजल आदी अधिकारीही प्रत्यक्ष मैदानात उतरले. उच्चपदस्थ अधिकारी सक्रीय झाल्याने सर्व सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारीही हिरीरीने कामाला लागले. आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक व जनता सर्वांनी मिळून स्वच्छता मोहिम राबविली. त्यासाठी मुहूर्त होता 5 जून जागतिक पर्यावरण दिन.
वृक्षारोपण
तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र केले. 1 जुलै 2015 रोजी संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी वृक्षारोपण करण्यात आले. एकच दिवशी जवळ जवळ 6 लाख झाडे लावण्यात आली. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पण निश्चित करण्यात आली.
या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आदी कलाकारांनी स्वतः भाग तर घेतलाच पण अजून आपल्या बरोबर अनेक सिने कलाकारांना देखील समाविष्ट करून घेतले.
रांगोळी, निबंध, पथनाट्य, लघुपट स्पर्धा
सर्व शाळांमधून अनेक प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. त्यांची प्रदर्शने भरवण्यात आली. अगदी गंगेवर पथनाट्य स्पर्धा भरवली. विजेत्यांना बक्षिसे/प्रमाणपत्र देण्यात आले. आणि सर्वांना अशा विविध मार्गांनी गोदावरीशी व निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
क्रमश: