इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा
अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न
दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीला पुनर्वेभव प्राप्त करुन देण्यासंदर्भातील विविध बाबी आपण जाणून घेत आहोत. त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रथमच गोदावरीबाबत अशी लेखमाला होत असल्याने त्याचे स्वागत होणे स्वाभाविक आहे.
आपण गोदावरीच्या प्रदूषणाबाबत यापूर्वी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण गोदावरीच्या अतिक्रमणाचा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अतिक्रमणाबाबत जाणून घेण्यापूर्वी नदीची हद्द म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं. आपण नेहमी बघतो की, यावेळेला नदीने निळी पूररेषा ओलांडली. यावेळी लाल रेषा ओलांडली. ही पूररेषा म्हणजे नक्की काय. वेगवेगळ्या रंगांची ती का असते. त्यातून काय बोध होतो. सरकार दरबारी त्याची काय व्याख्या आहे, हे जाणून घेतल्यावरच आपल्याला सर्व समजू शकेल.
पिवळी पूररेषा म्हणजे मागील पंचवीस वर्षात आलेल्या महापुरामध्ये नदीने तिची निश्चित केलेली हद्द. निळी पूररेषा म्हणजे २५ वर्षांपूर्वी आणि गेल्या शंभर वर्षांपर्यंतची हद्द. तर, सर्वात मोठा महापूरात नदीचे पाणी जिथपर्यंत पोहोचते व तिची हद्द निश्चित होते त्या हद्दीला लाल पूर रेषा म्हणतात.
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व कायद्यानुसार निळ्या पुरेरेषेमध्ये कुठल्याही पद्धतीचे बांधकाम करणे हे बेकायदेशीर आहे. ते नदीच्या हद्दीत अतिक्रमणच आहे. ही सर्व बांधकामे तोडून टाकण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर महाड जवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यावेळी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेमध्ये भाग घेण्याच्या योग मला आला. त्यांनी मला प्रश्न विचारला की, तुमच्या इथला गोदापार्क वाहून गेला. त्यावेळी मी त्यांना उत्तर दिले होते की, नदीच्या घरात आपण घुसलो तर नदी आपल्या घरात येणारच. त्यापेक्षा आपण तिला तिचे तिचे मुक्तपणे वाहू द्यावे. जेणेकरून तिला पण त्रास नाही आणि आपल्यालाही.
पूररेषा नक्की कोणासाठी आहेत. नदीसाठी आहेत का, तर बिलकुल नाही. मनुष्यहानी होऊ नये, वित्त हानी होऊ नये म्हणून पूररेषा आहे. नदीला काही फरक पडत नाही. उद्या ती नाशिक-पुणे महामार्गांनेही वाहिल. फरक आपल्याला पडतो. जिथे अतिक्रण होते, त्याच्या खालच्या भागातील रहिवाशांना परिणाम भोगावे लागतात. त्यांची काहीच चूक नसताना.
पूर्वीच्या काळी खूप पाऊस पडला आणि गंगापूर धरणामधून पाणी सोडलं तर गोदावरीची पूर रेषा ओलांडली जात असे. आता परिस्थिती वेगळी आहे. आता धरणांमधून एक थेंब पाणी न सोडताही गोदावरीला पूर येतो. त्याचे कारण म्हणजे आता आपण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर काँक्रीट टाकून ठेवलेले आहे. ओढे-नाले देखील काँक्रीटचे बनले आहेत. तसेच आपल्या संपूर्ण शहरात पडणारे पावसाचे पाणी पावसाळी गटारीमधून थेट नदीत सोडले गेलेले आहे. पूर्वीच्या काळी हे पावसाचे पाणी हळुवारपणे नाल्यांमधून जमिनीची भूक भागवत नदीमध्ये येत असे. ते आता थेट येते. त्यामुळे नदीला पूर येतो. तसेच ते पाणी जमिनीत मुरत नसल्यामुळे आपल्या नद्या रस्त्यावरून वाहतात. मुंबईत तर रेल्वे ट्रॅक वरून वाहतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. व आपल्या सर्वांचेच नुकसान होते. त्यामुळे पूररेषेचे गांभिर्य ओळखणे आणि तिचे पालन करणे गरजेचे आहे.