लोकजनशक्ती पार्टी (एलजेपी) प्रमुख (माजी) चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए) मध्ये राहूनही सहकारी पक्ष संयुक्त जनता दलाविरोधात (जेडीयू) प्रचार केला होता. त्यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान असल्याचे सांगून भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जेडीयूला बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष होता आले नव्हते.
एनडीए मध्ये सुद्धा जेडीयूचा पूर्वीसारखा दरारा राहिला नव्हता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खुपणार्या चिराग पासवान यांच्यावर जेडीयूचा बाण निशाण्यावर लागलेला आहे. चिराग यांना आता स्वतःच्या पक्षातून बेदखल करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे चिराग यांच्याविरोधात जेडीयू थेट वक्तव्य करत असताना भाजप मात्र शांत आहे. त्यामुळे भाजप याबाबत शांत का आहे ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
लोजपावर कब्जासाठी लढाई
लोकसभेत चिराग पासवान यांच्यासह लोजपाचे सहा खासदार होते. त्यापेकी पाच खासदारांनी चिराग यांच्याविरुद्ध बंड पुकारून स्वतःला खरी लोजपा घोषित केले आहे. चिराग यांनीही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. बंडखोर खासदारांनी चिराग यांचे काका पशुपती कुमार पारस यांना लोजपाच्या संसदीय दलाचा नेता निवडले आहे. तसेच पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आपत्कालीन बैठक घेऊन चिराग पासवान यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटवून राष्ट्रीय उपाध्यक्ष सूरजभान सिंह यांना कार्यकारी अध्यक्ष निवडले आहे. त्यांच्यावर पुढील अध्यक्ष निवडण्याची जबाबदारीही दिली आहे. त्यानंतर चिराग पासवान यांनीही कार्यकारिणीची बैठक घेऊन पाचही खासदार (पशुपती कुमार पारस, चौधरी मेहबूब अली कैसर, वीणा देवी, प्रिंस राज आणि चंदन सिंह) यांना पक्षातून बडतर्फ केले आहे. चिराग पासवान आणि बंडखोर नेत्यांमध्ये पक्षावर कब्जा करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
राजकीय वातावरण तापले
लोजपाच्या फुटीवरून बिहारचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चिराग पासवान यांना राष्ट्रीय जनता दलामध्ये सहभागी होण्याची ऑफर चिराग यांचा भाऊ वीरेंद्र यांनी दिली आहे. लोजपाच्या बंडखोर खासदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांना विरोध केल्याबाबतही बंडखोर खासदारांनी टीका केली आहे.
बंडखोर खासदार दिल्ली आणि पाटणामधील जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. बंडखोरी केल्यानंतर त्यांनी त्वरित जेडीयूचे खासदार ललन सिंह यांची भेट घेतली होती. लोजपामध्ये फूट पाडण्याचा आरोप जेडीयूने फेटाळला आहे. एनडीएमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सहकारी व हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतन राम मांझी यांनीही खुलेआम चिराग पासवान यांच्यावर टीका केली आहे.
एनडीएचे घटक पक्ष शांत
महत्त्वाची बाब म्हणजे एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष भाजपने केंद्र सरकारमधील सहकारी पक्ष लोजपामध्ये सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वावर शांत राहणेच पसंद केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल यांनी लोजपाचा अंतरिक मुद्दा असल्याचे सांगितले आहे. लोजपा वेगळा पक्ष आहे आणि त्यांच्या अंतर्गत बाबींवर भाजप कोणतेच वक्तव्य करणार नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चिराग यांच्याबद्दलची सहानुभूती महागात
चिराग पासवान यांच्याबद्दल भाजपचे तोंडावर बोट का आहे, हा प्रश्न आहे. चिराग यांना पाठिंबा देऊन बिहारमधील स्थिर सरकारला धोक्यात आणण्यची इच्छा भाजपना नाहीये. नितीश कुमार यांची चिराग यांच्याबाबतची नाराजी मर्यादेपेक्षा जास्त आहे. पश्चिम बंगालमधील पराभवामुळे भाजप एक पाऊल मागे गेला तर जेडीयू एक पाऊल पुढे आले आहे. याचदरम्यान आरजेडीप्रमुख लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर बाहेर आले आहेत.
सत्तांतर करण्यामध्ये प्रसिद्ध असलेले लालू प्रसाद यादव बिहारमध्ये सरकार पाडण्याची कोणतीच कसर ठेवणार नाही, हे भाजप जाणून आहे. आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी जीतनराम मांझी यांच्याशी घेतलेली भेट चर्चेत आहे. विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी यांच्याशीही लालूप्रसाद यांची फोनवर चर्चा झाली आहे. सत्ताधारी पक्षातील एका गटासोबत लालू यांची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणे भाजपला महागात पडू शकते.
दरम्यान, चिराग पासवान आणि बंडखोर खासदारांमधील राजकीय लढाईचा जिंकण्याचा मार्ग पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटकडे जातो. त्यामुळे जो ही लढाई जिंकेल त्यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळू शकते.