नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू वा मित्र नसतो, असे सांगण्यात येते. वेळोवेळी या वाक्याची प्रचितीदेखील येत असते. सकाळी एकमेकांवर टीकेचे शस्त्र सोडणारे सायंकाळी एकाच मेजवर जेवत असतात, असेही चित्र आपण पाहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानातील नवीन राजकीय संबंधांची चर्चा रंगली आहे. राजस्थानात भाजपच्या वसुंधरा राजे यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मैत्रीचा हात दिला आहे. राजस्थानातील हे सत्तेचे समीकरण सध्या सर्वांनाच अचंबित करणारे ठरत आहे.
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सध्या सत्तेची धुरा असलेली काँग्रेस, भाजप आणि इतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना स्वत:च्या पक्षातून सचिन पायलट यांचे अंतर्गत आव्हान राहणार आहे. ही सर्व स्थिती लक्षात वसुंधरा राजे आणि अशोक गेहलोत यांच्यातील निकटता चर्चेचा विषय ठरत आहे.
२०२० साली भाजपाने काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करत मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपाच्या तीन नेत्यांचे रविवारी आभार मानले आहेत. या तीन नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपचे आमदार कैलाश मेघवाल आणि शोभाराणी कुशवाह यांचा समावेश आहे. दोघांनीही भाजपाच्या घोडेबाजाराचा विरोध करून त्यात सहभागी होण्यास नकार दिला होता, असा दावा गेहलोत यांनी केला आहे.
वसुंधरा राजेंनी फेटाळून लावला दावा
गेहलोत यांचा दावा फेटाळून लावत वसुंधरा राजे यांनी टीका केली आहे. तर या दाव्यावर अद्याप इतर दोन आमदारांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही.
BJP Operation Lotus Rajasthan Politics