कोलकाता – राजकीय पक्ष नेते व कार्यकर्त्यांमध्ये कोलांटउड्या ठरलेल्याच असतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात त्यांचे जाणे हे काही नाविन्य नाही. पक्षप्रवेशावेळी कुणी हातात पक्षाचा झेंडा घेते, कुणी शाल पांघरते, कुणी हातावर बंधन बांधते तर आणखी काही. पण, हे केल्याने या सर्वांची शुद्धता थोडेच होते. पण, येथे मोठा गंमतीशीर प्रकार घडला आहे. भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये येणाऱ्या १५० कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. त्यांचे शुद्धीकरणाचा मार्ग सध्या देशभरात चर्चिला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या यंदा झालेल्या देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालची निवडणूक विशेष गाजली. त्यानंतर आता या राज्यात पुन्हा नेते आणि कार्यकर्ते यांचे आयाराम गयाराम सुरु आहे. बीरभूम जिल्ह्यात सुमारे १५० भाजप कार्यकर्ते गुरुवारी तृणमूलमध्ये सहभागी झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थिती झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात नवीन कार्यकर्त्यांवर चक्क सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
या कार्यक्रमात स्वच्छताविषयक औषध फवारणी केल्याबद्दल खुलासा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्ती व तृणमूल कॉंग्रेसचे ब्लॉक स्तरीय सदस्य दुलाल राय म्हणाले की, इलामबाजार येथे भारतीय जनता पक्षातून आलेल्या या कार्यकर्त्यांवर सॅनिटायझरची फवारणी केली गेली. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी तृणमूलचा झेंडा त्यांच्या हाती सोपविला. कारण यापुर्वी भाजपासाठी काम करणाऱ्याना या लोकांना विषाणूची लागण झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यापूर्वी, आम्हाला खात्री करुन घ्यायची आहे की, ते संसर्गमुक्त होतील. कारण आमचा हेतू लोक विषाणूपासून मुक्त होणे हा आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष ध्रुव साहा यांनी केला. यावेळी साहा म्हणाले की, त्यांच्या इच्छेनुसार कोणीही भाजपाकडून तृणमूलला गेले नाही. तृणमूलचे नेते असे कार्यक्रम आयोजित करीत आहेत आणि मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराचे आरोप टाळण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना तृणमूलमध्ये सामील होण्यासाठी भाग पाडत आहेत. दोन दिवसांपूर्वी हुगळी जिल्ह्यातील २०० भाजपा कार्यकर्त्यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाण्यापूर्वी स्वत: चे डोके मुंडण करावे लागले,असेही ते म्हणाले.