केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील युद्ध आता चांगलेच तापणार असल्याची बाब समोर आली आहे. देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल चक्क १ तासासाठी ब्लॉक केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रसाद यांनी स्वतःच माहिती दिली आहे. कू या स्वदेशी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर प्रसाद यांनी तसे सांगितले आहे. कुठल्याही परिस्थितीत आयटी कंपन्यांना देशाचे कायदे पाळावे लागतील. अशा प्रकारे अकाऊंट ब्लॉक करुन ट्विटरने माहिती तंत्रज्ञान नियम २०२०चे उल्लंघन केले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे अकाऊंट ब्लॉक करणे हे बेकायदा आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढील काळात ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष चांगलाच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी ट्विटरला याप्रकरणी चांगलेच लक्ष्य केले आहे. जर माहिती-तंत्रज्ञान मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, परदेशी कंपन्या त्यांची मनमानी भारतात कशी करु शकतात, केंद्र सरकारने ट्विटरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.