मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याला आमची कधीही हरकत नव्हती, पण आम्ही पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली.
आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) पुढील महिन्यात आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पहिले सप्टेंबरमध्ये पाकिस्तानला करण्याचे ठरले होते. पण पाकिस्तानात न जाण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भूमिका स्पष्ट असल्याने हा बेत रद्द करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही या स्पर्धेतील महत्त्वाचे संघ आहेत, त्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये होणारी ही स्पर्धा एसीसीने मार्चमध्ये घेण्याचा विचार केला. कारण पाकिस्तानात स्पर्धा झाल्यास भारत त्यात सामील होणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. अशात पर्यायी यजमान शोधण्याची मोहीम सुरू झाली. आता यजमानपदाच्या शर्यतीत अबुधाबी, शारजाह आणि दुबई हे तिन्ही देश आहेत.
मात्र निर्णय नाही
एसीसीने बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पण स्पर्धेच्या यजमानपदाबाबत निर्णय झाला नाही. हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. कारण पाकिस्तानात जाऊन खेळणार नसल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जय शहा यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, यजमान म्हणून पाकिस्तानचे नाव सुद्धा बैठकीत आले नाही, हे विशेष.
यापूर्वीही खोळंबा
पाकिस्तानात जाणार नाही, या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ठाम असल्यामुळे यापूर्वीही अनेकदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा खोळंबा झाला आहे. केवळ भारतच नाही तर अॉस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघांनीही विविध मालिकांसाठी पाकिस्तानात जायला नकार दिला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या संघांचा सहभाग असतो.
Asia Cup 2023 Team India Pakistan Tour BCCI Stand