शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतर्गंत कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात २०२२ मध्ये ५३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर २०२३ मधील ३९ प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
कृषी विभागाच्या संगमनेर उपविभागात संगमनेर, अकोले, कोपरगांव व राहाता या तालुक्यांचा समावेश होतो. शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरवतो, तर काही वेळा दिव्यांगत्व स्वीकारावे लागते. यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी शासनाच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी अपघात विमा योजना राबविली जाते.
या योजनेत २०२२ मध्ये संगमनेर -१९, अकोले -१२ , कोपरगांव – १० व राहाता -१२ असे एकूण ५३ प्रस्तावास मंजूरी मिळाली असून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयास विमा रक्कम ही देण्यात आली आहे. २०२३ साठी संगमनेर मधून १८, अकोले – ११, कोपरगांव -१ , राहाता मधून ९ प्रस्ताव अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
असा दिला जातो विम्याचा लाभ
२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता. परंतु, या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्षात घेता रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली. जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल. शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख, शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाईल. अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.
लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता
महाराष्ट्रातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य यामध्ये आई, वडील, लाभार्थ्याचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे । वयोगटातील एकूण दोन जणांना लाभ घेता येईल.
शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा विमा उतरवणे शक्य होत नाही. अशा वेळी शेतात काम करताना अपघात झाल्यास त्याला इलाज करण्यासाठी पैसे नसल्याकारणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासर्व पार्श्वभूमीवर सदरच्या योजनेचा शेतकरी बांधवांनी जरूर लाभ घ्यावा. असे आवाहन ही श्री.बोराळे यांनी केले आहे.
Agriculture Crop Insurance Farmer Help Scheme