काबुल (अफगाणिस्तान) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांच्या अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याला परत बोलण्याच्या धोरणामुळे आता अफगाणिस्तान मध्ये हळूहळू तालिबानींचा कब्जा बसू लागला आहे. त्यामुळे मूळ देशातील असलेले ३०० सैनिक भीतीने देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा अफगाणिस्तानचा सुरक्षा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर बनला आहे.
अफगाणिस्तानात अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानी अफगाण सुरक्षा दलांवर जोरदार हल्ला करत आहेत. तालिबान्यांनी जिल्ह्यांचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेण्याचा दावा केला आहे. विशेषत: तालिबान हे ईशान्य अफगाणिस्तानमध्ये दररोज अनेक जिल्हे त्याच्या नियंत्रणाखाली आणत आहेत. तालिबान लोकांना हाकलून दिल्यानंतर सुरक्षा दलाचे तीनशे सैनिक आपल्या देशाची सीमा पार करून अखेर ताजिकिस्तानला पोहोचले.
राष्ट्रीय सुरक्षा विषयावरील ताजिकिस्तानच्या राज्य समितीने म्हटले आहे की, हे सैनिक बदाखशान प्रांताच्या सीमेवरुन आले आहेत. आम्ही मानवतेमुळे त्यांना येथे प्रवेश दिला गेला. एप्रिलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याची घोषणा झाल्यापासून तालिबानी अफगाणिस्तान मध्ये स्थिर होत असून त्यांचा प्रभाव देशाच्या उत्तर भागात वेगाने वाढत आहे.
तालिबानचा दावा आहे की, त्यांनी १२१ जिल्ह्यांपैकी ८० जिल्ह्यांचा ताबा घेतला आहे. प्रांतीय परिषदेचे सदस्य मोहिब-उल-रहमान यांनी म्हटले आहे की, ईशान्येकडील बदाखशान मधील अनेक जिल्हे सुरक्षा दलांनी लढा न देता सोडले आहेत. गेल्या तीन दिवसांत दहा जिल्हे तालिबानकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.
अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे की, तालिबान्यांचा कब्जा तात्पुरता आहे, लवकरच हे जिल्हे त्यांच्याकडून घेतले जातील. तर संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे की, गेल्या २४ तासांमध्ये अफगाण सुरक्षा दलांनी प्रभावी कारवाई केली आणि १४३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि १२१ तालिबानी जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्यातील अमेरिकेची सर्वात मोठी चिंता म्हणजे २० वर्षे मदत केली त्या सुमारे ५० हजार अफगाण सहयोगी लोकांचे संरक्षण होय. त्यामध्ये दुभाषे आणि इतर तांत्रिक लोक मोठ्या संख्येने आहेत. तालिबान अशा अफगाण नागरिकांना सातत्याने धमकी देत आहे. या सर्वांना मध्य आशियाच्या तीन देशांमध्ये आश्रय देण्याचा अमेरिका प्रयत्न करीत आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था अफगाण मधील आयएसआय दहशतवाद्यांना सर्व आवश्यक वस्तू पुरवते. यात तालिबान, हक्कानी नेटवर्क, जैश-ए-मुहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी-अतिरेकी संघटनांमध्ये प्रमुख आहेत. त्यांना प्रशिक्षण, शस्त्रे, निधी आणि गुप्तचर पुरवले जात आहेत. तसेच सन २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आणि २०१९च्या पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका चव्हाट्यावर आली आहे. तो दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देतो. जैशचे प्रमुख मसूद अझर हे त्याचे मोठे उदाहरण आहे.