मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षांपासून नवरात्रोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. यंदा कोरोनाचे संकट नसल्याने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. पण या तयारीत यंदा पावसाचे विघ्न आले आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पावसात गरबा खेळावा लागण्याची चिंता अनेकांना सतावू लागली आहे.
राज्यात पावसासाठी पुन्हा हवामान पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यात उन्हाची स्थितीदेखील पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली होती.
परतीचा प्रवास थांबला
राज्याच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस पावसाची शक्यता आहे. काही भागात तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबरच, महाराष्ट्राच्या उर्वरीत काही ठिकाणीही पावसाची नोंद झाली आहे. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. उत्तर पंजाब आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेश आणि परिसरावर देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिलाय.
काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस
चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Alert IMD Climate Heavy Rainfall Forecast
Weather Maharashtra