नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एम.बी.ए. शिक्षणक्रमाला ऑल इंडिया कौन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ची मान्यता मिळाली आहे. याबाबतची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केली. यावेळी कुलसचिव भटूप्रसाद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे उपस्थित होते.
दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या या मान्यतेमुळे मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला अधिक महत्व प्राप्त होऊन याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला प्रवेश घेता येणार आहे. ही मान्यता असून आगामी पाच वर्षांसाठी आहे. या मान्यतेमुळे मुक्त विद्यापीठातून एमबीए पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात एआयसीटीईच्या मान्यतेमुळे नोकरी व्यवसायात अधिक महत्व प्राप्त होणार आहे. या शिक्षणक्रमासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याकरता प्रवेश पात्रता परीक्षाही लवकरच घोषित केली जाणार आहे. विविध विषयांसोबतच ऑन जॉब ट्रेनिंग, फिल्ड प्रोजेक्ट, ओपन इलेक्टिव्हज ही एमबीएची वैशिष्ट्ये असणार आहेत. मार्कटिंग, ह्युमन रिसोर्स आणि फायनान्स या तीन प्रमुख शाखा असणार आहेत.
व्यावसायिक दर्जा प्राप्त होईल – कुलगुरू प्रा. सोनवणे
एआयसीटीईच्या मान्यतेमुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला अधिक व्यापक प्रतिसाद मिळेल. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि त्या मार्फत चालवले जाणारे एमबीएसारखे महत्वाचे शिक्षणक्रम यांना नव्या युगातील व्यावसायिक विश्र्वात एक चांगला दर्जा प्राप्त होईल, यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी व्यक्त केली.
सकारात्मक प्रयत्नांना यश – डॉ. पाटोळे
मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला एआयसीटीईची मान्यता मिळण्यासाठी कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू होते. संबंधित विद्याशाखा तथा विद्यापीठ प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यापीठाच्या एम.बी.ए.ला एआयसीटीईची मान्यता मिळू शकली आहे, अशी प्रतिक्रिया वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक डॉ. सुरेंद्र पाटोळे यांनी व्यक्त केली.