मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नसमारंभात लग्नघरची मंडळी घाईगडबडीत असल्याने अनेकदा मौल्यवान वस्तूंकडे दुर्लक्ष होते आणि याचाच फायदा चोर घेतात. कारण लग्न म्हटले की, लगीन घाई आलीच. मात्र, याचाच गैरफायदा घेत हातसफाईने लग्नामधील दागिने पळून नेणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रिय झाली होती. या टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते.
शेवटी प्रयत्न करून खोपोली पोलिसांनी या टोळीला अटक करत मुद्देमाल देखील जप्त केला आहे. खोपोली येथील पेण मार्गावर शिलफाटा हद्दीत एका नामांकित हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता. परंतू नवरी मुलींच्या आईकडे असलेली सोने ठेवलेली बॅग अतिशय सफाईदारपणे चोरी करून चोरट्यांनी तेथून पळ काढल्याची घटना घडली.
या बाबत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आणि पथकावर या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली. या पथकाने चांगली कामगिरी करत चोरीतील आरोपींना चक्क राजस्थानमधून ताब्यात घेतले. मात्र, या आरोपींनी चोरीचा मुद्देमाल मध्य प्रदेशात लपून ठेवल्याचे कबुल केले.
ज्या गावात या चोरट्यांनी चोरीचा माल ठेवला होता. त्यागावात जवळपास 90 टक्के लोक चोरी करतात. पोलिस जर त्यागावात चोरांना पकडण्यास गेले तर तेथे पोलिसांवर हल्ला केला जातो. एका महिन्यांपूर्वीच त्यागावात पोलिस चोरांना पकडण्यास गेले असता त्यांच्यावर गावकऱ्यांनी हल्ला केला होता. पोलिस पथकाने आरोपींना तर अटक केली होती. मात्र, चोरीचा मुद्देमाल मध्य प्रदेशातील गावातून जप्त करणे हे मोठे आवाहन पोलिसांपुढे होते.
या गावात खोपोली पोलिस वेशांतर करुन गेले आणि अतिशय चतुरपणे त्यांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी अंमलदार प्रसाद पाटील, प्रवीण भालेराव, प्रदीप खरात, रामा मासाळ, स्वागत तांबे यांनी केली. या आरोपींचा शोध लावण्यासाठी लग्न समारंभातील 500 पेक्षा अधिक व्यक्तींची माहिती घेवून खोपोली व परिसरातील तब्बल 80 पेक्षाही अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी पोलिसांनी केली होती.
Wedding Ceremony Big Racket Burst by Police
CCTV Footage Khopoli Police