इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. विवाह हा भारतीय संस्कृतीत १६ संस्कारांपैकी एक मानला जातो. याच सोहळ्यात विविध प्रकारचे किस्सेही घडतात. अशीच एक मजेशीर घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. भर लग्न मंडपातून नवरदेवाने चक्क पळ काढला. त्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला.
जहांगीराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत कुटी गावातील रहिवासी अवधारम यांनी आपली मुलगी रोशनीचे लग्न अयोध्या जिल्ह्यातील मवई येथील छोटू यांचा मुलगा श्यामलाल याच्यासोबत निश्चित केले होते. नियोजित तारखेला २ डिसेंबरला रात्री छोटू लग्नाची मिरवणूक घेऊन आला होता. मिरवणूक आल्यानंतर द्वारपूजा होत होती, त्याच दरम्यान कार्यक्रमस्थळी डीजे वाजवण्यावरून नागरिक आणि वऱ्हाडींमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यावर हाणामारी सुरू झाली. नातेवाईकांच्या अपमानाचे कारण देत छोटूने लग्नास नकार दिला आणि भर लग्न मंडपातून निघून गेला.
याप्रकरणी वधूच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात हुंड्याचा गुन्हा दाखल केला. शनिवारी मुलीच्या वडिलांनी जहांगीराबाद पोलीस ठाण्यात सांगितले की, वराचे वडील हुंड्यात मोटारसायकलची मागणी करत होते, ती न मिळाल्याने त्यांनी वाद घातला आणि मिरवणूक घेऊन निघून गेले. वधूनेही पोलीस ठाणे गाठून छोटूशी लग्न न केल्यास आत्महत्या करेन, असे पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी छोटू आणि वडील श्यामलाल यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर छोटूसह सासरकडचे मान्यवरांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. वधू आणि वर यांच्यात पोलिसांनी समेट घडवून आणला. तसेच, यापुढे भांडण वा वाद न करण्याची लेखी हमीही पोलिसांनी घेतली, त्यानंतर पोलिस स्टेशनमध्येच वधूवरांचे लग्न लावून देण्यात आले. पोलिस स्टेशनमध्ये रंगलेला हा सोहळा पाहून सारेच अचंबित झाले. त्यानंतर सर्व जण आनंदाने पोलिस स्टेशन बाहेर पडले.
Wedding Bride Groom Fly Away Police