नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात कधी येईल याची वाट भारतीय बाजारपेठेत अनेक दिवसांपासून बघितली जात आहे. मात्र, जोपर्यंत एलन मस्क भारतात इलेक्ट्रीक कार बनवणे सुरू करत नाही, तोपर्यंत या गाड्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, याच मस्क यांना भारत सरकारने चांगलाच हिसका दाखविल्याची बाब समोर आली आहे.
टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क मोदी सरकारला इलेक्ट्रिक कारवरील करात सूट देण्याची विनंती करत आहेत. पण सरकारकडून अद्याप ही सूट दिली जात नसल्याचे दिसून येते. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर हे यानिमित्त म्हणाले की, जोपर्यंत मस्क भारतात गाड्यांचे उत्पादन सुरू करत नाही तोपर्यंत टेस्लाला सूट दिली जाणार नाही. टेस्लाची बाजारपेठ भारतात असेल आणि चीनमध्ये रोजगार निर्माण होईल, हे शक्य नाही. तसेच मस्कची योजना भारतीय सरकारी धोरणानुसार नाही सरकारच्या धोरणानुसार कंपनीने अद्याप योजनांसाठी अर्ज केलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच गेल्या वर्षी एलोन मस्कच्या नेतृत्वाखालील कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती, परंतु अवजड उद्योग मंत्रालयाने कोणतीही सवलत देण्यास नकार दिला आहे.
अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले की, देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने तीन योजना लागू केल्या आहेत. एक उत्पादनाशी संबंधित आणि दोन पुरवठ्याशी संबंधित अशा या योजना आहेत. सर्व देशी-विदेशी कंपन्यांनी या योजनांचीच अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या योजनांतर्गत आतापर्यंत ११५ कंपन्यांनी अर्ज केले आहेत, त्यापैकी ५० परदेशी आणि ६५ भारतातील आहेत. भारतातील बाजारपेठेचा वापर करायचा असेल, तर भारतीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील, असे सरकारचे धोरण आहे. कंपनीसाठी भारताचे दरवाजे खुले आहेत. मात्र, त्यांनी आमच्या धोरणानुसार अर्ज करावा, येथे या, उत्पादन इथेच करा आणि आमच्या लोकांना रोजगार द्या, हे धोरणही स्वीकारावे लागेल, असे केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले आहेत. तर टेस्ला सध्या अमेरिकेशिवाय जर्मनी आणि चीनमध्ये आपली वाहने तयार करते. कंपनी चीनमधील आपल्या कारखान्यातून आशियाई आणि युरोपियन बाजारपेठेत आयात करते. टेस्लाने मेड इन चायना वाहने भारतात विकण्याऐवजी भारतात कारखाना उभारण्याचा विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले आहे.