मुंबई – भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या चांगली कामगिरी करू शकत नसल्याने त्याच्यावर टीका होत आहे, तर काही जण त्याला पाठिंबा देत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवण्यात आले होते. त्याच्या कामगिरीविषयी कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारला असता विराटने अजिंक्यला पाठिंबा दर्शवला आहे.
विराट म्हणाला की, अजिंक्यच्या फॉर्मबद्दल आकलन केले जाऊ शकत नाही. मीच काय, कोणीही असे आकलन करू शकत नाही. एखादा खेळाडू कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे फक्त त्याच खेळाडूला ठाऊक असते. महत्त्वाचे म्हणजे आपली मागील कामगिरी पाहून अजिंक्य संघात सुरक्षित आहे. तो सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्यामध्ये आपण त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे त्याची मागील कामगिरी चांगली झाली आहे. संघात काय सुरू आहे हे फक्त खेळाडूंनाच ठाऊक असते. मैदानाच्या बाहेरील जगात खूप काही घडत असते. परंतु त्या गोष्टींचा आमच्या खेळावर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. मग संघात रहाणे असो अथवा आणखी इतर कोणी असो, आम्ही प्रत्येक खेळाडूला पाठिंबा देत असतो. बाहेरील जगात काय सुरू आहे त्यावरून आम्ही निर्णय घेत नाहीत. या डावानंतर त्याला एक फलंदाज म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून पुढे जाण्यासाठी मदत मिळेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर विराट कोहली याने आपल्या खराब कामगिरीबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, दोनदा चूक केल्यावर त्यामध्ये सुधारणा होण्याची गरज असते. तुम्हाला पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि ज्या चुका तुम्ही पुन्हा पुन्हा करत आहात, त्या दूर कराव्या लागतील. फक्त तुम्ही वाईट काळातून बाहेर पडू शकतात, यावर तुमचा विश्वास असला पाहिजे.
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण अफ्रिकेचा दौरा २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या दौर्यादरम्यान भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाची निवड करावी यामध्ये आता स्पर्धा निर्माण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटीमध्ये दमदार पदार्पण करणार्या श्रेयस अय्यरला संघात स्थान द्यावे की अजिंक्य रहाणेला द्यावे यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणने प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या चर्चेदरम्यान लक्ष्मण म्हणाला, की अजिंक्य रहाणे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. मी संघात श्रेयस अय्यरला पाहू इच्छितो. कारण श्रेयसने पदार्पण सामन्यात केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. श्रेयसने मिळालेल्या संधीचे सोने केले असून, त्याला संघात कायम ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला एका युवा फलंदाजावर विश्वास टाकावा लागेल. माझा श्रेयसवर विश्वास आहे.