इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढावे म्हणून सरकार आणि प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अफवा आणि विविध गैरसमजुतींमुळे काही जण लस घेण्याचे टाळत आहेत. आता तर एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे, संपूर्ण गावाने लसीकरणावर बहिष्कार टाकला. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांन हे गावच सील करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही बाब देशभरात चर्चिली जात आहे.
उत्तर प्रदेश मधील सहारनपूर परिसरातील चकवली गावात ग्रामस्थ कोरोनाची लस घेत नसल्याचे समोर आले आहे. देशभरात अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने गावा-गावांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तरीदेखील चकवली ग्रामस्थ प्रतिसाद देत नसल्याने हे गावच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (प्रांताधिकारी) सील करून टाकले आहे. कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवा मगच गावाची वेस ओलांडा, असा नियमच प्रांताधिकाऱ्यांनी लागू केला आहे. त्यामुळे आता लस घेण्याशिवाय कोणताही पर्याय ग्रामस्थांकडे उरलेला नाही.
रामपूर मणिहरन पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या चकवली गावात लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना लसीकरण झालेले नाही. गावकरी कोरोनाची लस घेण्यासाठी घाबरत आहेत. तर प्रशासन गावात सतत कोरोनाची लस घेण्यासाठी मोहिम राबवून प्रेरित करत आहेत. उपविभागीय दंडाधिकारी संजीव कुमार, तहसीलदार विपिन द्विवेदी हे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी गावातील ग्रामस्थांशी सातत्याने संपर्क करत आहेत. तरीही ग्रामस्थ लसीकरणासाठी केंद्रावर येत नाहीत. त्यामुळे संजीव कुमार यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. चकवली गावात येणारा मुख्य रस्ता प्रांताधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सील करण्यात आला आहे. गावातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच बाहेर जाता येणार आहे. प्रांतांच्या या आदेशावरुन ग्रामस्थांमध्ये नाराज आहे.
उपविभागीय दंडाधिकारी संजीव कुमार म्हणाले की, ग्रामस्थ कोरोनाची लस घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावाच्या मुख्य सीमेवर त्यांच्यासाठी अडथळा आणण्यात आला आहे. गावाबाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. चकवली गावाची लोकसंख्या दहा हजार असून मतदार ५२०० आहेत. बहुसंख्य ग्रामस्थ कोरोनाची लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. गावप्रमुख प्रतिनिधी नकुल हे देखील दररोज गावातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत आहेत. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्य रस्ता सील करण्याचे पाऊल उचलल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.