इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
मनःशांती मिळविण्यासाठी
सर्वत्र सरळ भाव राखा. मनःशांती मिळविण्यासाठी एवढे अधीर आणि आतुर कशाला होता ? ती एक नवीनच काळजी मनाला लावून घेऊ नका. ही काळजी सोडलीत तर आपोआपच मनाला शांती लाभेल. ते अधिकाधिक स्तब्ध होत जाईल. तसेच, पूर्णत्वाच्या मागे हात धुवून लागल्यासारखे करू नका. तर तुमची प्राप्त कर्तव्यकर्मे निर्दोषपणें पार पडतील असे वागा म्हणजे झालें. त्यायोगेच तुमच्या नित्यजीवनास आध्यात्मिकतेचे वळण व स्वरूप येऊ लागेल.
उद्याचाही वाजवीपेक्षा अधिक विचार करू नका. ज्याच्या कृपेने या आजच्या दिवसापर्यंत तुम्ही सुखरूप आला आहात, त्याच्याच कृपेने पुढेही तुमची वाटचाल चालेलच. त्यांत स्वतः मुद्दाम असा विचार करण्याची आवश्यकताच काय ? परमेश्वराच्या परम सामर्थ्यावर आणि परम कारुण्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यावर निर्मळ प्रेम करण्याचा प्रयत्न करा. त्यांत सर्वकाही येऊन जाईल. साधना आणि सिद्धीही.