ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचविलेल्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पांतील कामांच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेच यांनी केला आहे. कोटेचा यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. मित्रपक्षाच्या आमदाराने केलेल्या तक्रारीमुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई पालिकेने संपूर्ण महानगराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या निविदा विभाग पातळीवरून काढल्या जात आहेत. प्रकल्पाच्या लहानमोठ्या निविदांमध्ये घोळ झाल्याचा आरोप यापूर्वी माजी नगरसेवकांनी केला होता. आता भाजपचे आमदार कोटेचा यांनीच या कामात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या बाकांच्या (स्ट्रीट फर्निचर) खरेदीसाठी मागवलेल्या २६३ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी कोटेचा यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आम्ही पहारेकरी!
शिवसेनेची सत्ता असताना भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकरी म्हणून भूमिका बजावली होती व अनेक प्रकरणांतील भ्रष्टाचार बाहेर काढले होते. भाजपने पाठपुरावा केल्यामुळे अनेक प्रकल्पांच्या निविदा रद्दही कराव्या लागल्या होत्या. राज्य सरकारच्या संकल्पनेतील प्रकल्पात खालच्या स्तरावर कसा भ्रष्टाचार सुरू आहे, ते आयुक्तांच्या निदर्शनास आणण्यासाठी पत्र लिहिले असल्याचेही कोटेचा म्हणाले.
नेमका आरोप काय?
रस्त्यांवरील बाकांसाठी २६३ कोटींचे काम कंत्राटदारांना मिळावे यासाठी विशिष्ट अटींचा निविदेत समावेश करण्यात आला. प्रकल्प केंद्रीय खरेदी विभागाच्या अखत्यारीत येत नसताना त्या विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. विविध प्रकारच्या १३ वस्तूंसाठी एकच कंत्राटदार कसा, तीन कंत्राटदारांपैकी दोघांना कामाचा अनुभव नाही. एकालाच काम मिळवून देण्यासाठी साटेलोटे असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे.
CM Eknath Shinde Concept BJP MLA Allegation