मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून साईनगर आणि सोलापूर या दोन मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावणार आहे. १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. हा इव्हेंट भरगच्च दिसावा याचे नियोजन केले जात आहे. रेल्वेच्या प्रत्येक विभागातील वरिष्ठांनी या एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याच्या सूचना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना केली आहे. सोबतीला अभियंता विभागासह, अन्य विभागांतील रेल्वे कर्मचाऱ्यांना उद्घाटन सोहळय़ाला हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. यामुळे कार्यक्रमाची विशेष तयारी केली जात आहे. या एक्स्प्रेसची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. आता उद्घाटनाची लगबग सुरू झाली आहे. किमान उद्घघाटनाच्या दिवशी दोन्ही एक्स्प्रेस प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या दिसाव्यात यासाठी प्रवाशांच्या जागी रेल्वे कर्मचाऱ्यांनाच बसवण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना एक्स्प्रेसमध्ये तीन – चार तास आधीच येऊन बसण्याची सूचना करण्यात आली आहे.
विभागांसाठी टार्गेट
दोन्ही गाड्यांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. मात्र, प्रवाशांच्या प्रतिसादाबाबत अनिश्चितता असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी टार्गेट दिले गेले असल्याचीही माहिती पुढे येत आहे. सोबतच कार्यक्रमासाठी विभागीय अभियंता विभागातील (उत्तर-पूर्व) २५ कर्मचारी, वरिष्ठ विभागीय अभियंता विभागातील (दक्षिण) ५० कर्मचारी, विभागीय अभियंता विभागातील (मुख्यालय) ५० कर्मचारी, वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापक विभागातील १०० कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
८०० कर्मचाऱ्यांसह ‘भार चाचणी’
कोणत्याही लोकल, एक्स्प्रेसची ‘भार चाचणी’ घेताना त्यात विटा, रेती, दगड, सिमेंट भरलेल्या गोण्या भरण्यात येतात. मात्र, वंदे भारतची ‘भार चाचणी’ परळ, माटुंगा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना बसवून घेण्यात आली. सोमवारी, सुमारे ८०० कर्मचाऱ्यांसह ‘भार चाचणी’ घेऊन एक्स्प्रेस घाट भागात नेऊन ‘ब्रेकिंग स्टिस्टम’ची तपासणी करण्यात आली.
Vande Bharat Express Mumbai Passengers Railway Employee Order