नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी पेटण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आता नाशिक–पुणे महामार्गावरदेखील अशीच घटना घडली आहे. धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने भीमा संतु कापडी (वय ४१) यांचा भाजून मृत्यू झाला आहे. सिन्नरच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
भीमा कापडी हे नाशिक – पुणे महामार्गावरुन सिन्नरकडे निघाले होते. या रस्त्यावर सिन्नरच्या गुरेवाडी फाट्याजवळ त्यांच्या धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यांना काही कळण्याच्या आतच पेटलेल्या दुचाकीच्या आगीने त्यांच्याभोवती विळखा घातला. अवघ्या काही वेळातच ते ९० टक्के भाजले. ही घटना पाहताच रस्त्यावर धावाधाव सुरु झाली. भीमा यांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यांना तात्काळ नाशिकमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर असलेल्या मोहदरी घाटात कारने पेट घेतल्याची घटना घडली होती. कार चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तो त्यातून बाहेर पडला. त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. पण या बर्निंग कार त्यानंतर चर्चेचा विषय ठरली होती. या घटनेची माहिती तात्काळ माळेगाव एमआयडीसीला देऊन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांची सेवा पोहचेपर्यंत मात्र आगीने पूर्ण कारला वेढा दिला होता. त्यामुळे अवघ्या काही क्षणात कार जळून पूर्ण खाक झाली होती.
दोन्ही घटना अवघ्या काही दिवसांच्या अंतराने एकाच रस्त्यावर घडल्या. नागरिकांमध्ये या घटना भीती पसरवणाऱ्या असून, वाहनांची काळजी घेण्यावर भर द्यावा असे आवाहन वाहन अभ्यासकांकडून केले जात आहे.