इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपला भारत देश हा खेड्यांनी नटलेला आहे, त्यामुळे ‘खेड्याकडे चला अन् खेड्याचा विकास करा ‘असे महात्मा गांधी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, असे दिसून येते. त्यामुळे शहरे प्रचंड प्रमाणात वाढत असून अनेक नागरी समस्या होत आहेत. तर दुसरीकडे खेडी ओस पडत आहेत, असेही दिसून येते. परंतु महाराष्ट्रातील काही गावांनी आदर्श खेडे किंवा आदर्श ग्राम व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या गावाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विशेष म्हणजे हिवरे बाजार या छोट्याश्या गावात एक दोन नाही तर चक्क ६० करोडपती व्यक्ती राहतात.
या गावाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात आपल्या कार्यकर्तुत्वाने नावलौकिक मिळवला आहे, अर्थात यामागे गावचे प्रमुख मानले जाणारे पोपटराव पवार आणि ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रम आहेत, हे निश्चितच, सर्वांनी मिळून या गावाचा विकास केला असून त्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. इतकेच नव्हे तर या गावाने अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत.
नगरपासून १६ कि. मी. अंतरावरचे हिवरे बाजार हे अंदाजे १२०० लोकवस्तीचे एक केवळ खेडे नाही तर खेड्यांच्या शाश्वत विकासातून समृद्ध भारताची पायाभरणी कशी होते, याचे उत्तम उदाहरण हिवरे बाजारने निर्माण केले आहे. नगर जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणेच हिवरे बाजार हे गाव सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधींचा अभाव अशा अनेक समस्यांनी या गावातील नागरिकांना ग्रासले होते. मात्र गेल्या अडीच दशकात या गावाने प्रचंड विकास करीत प्रगती साधली आहे.
गावचे तरूण पोपटराव पवार यांनी बाहेर शिक्षण घेतल्यानंतर गावातच काम करायचे या निर्धाराने ते गावी परतले. त्यानंतर त्यांनी जोमाने काम सुरू केले आणि अनेक सुविधांपासून वंचित असलेल्या हिवरे बाजार गावाचा कायापालट केला. आज देशातील सर्वात श्रीमंत गांव म्हणून स्वतंत्र ओळख या गावाने निर्माण केली आहे. हिवरे बाजार हे दुष्काळी गांव म्हणून ओळखले जायचे. मात्र, शेजारीच असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात झालेल्या पाणलोट क्षेत्रासारखेच काम हिवरे बाजार गावात पोपटराव पवार यांनी सुरू केले.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार ग्रामसभेत मांडण्यात आला. त्यामुळे आसपासचा डोंगर, पडीक तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली. दरवर्षी मानसी एक झाड लावण्याचा संकल्प करताना गावाने स्मृतिवन विकसित केले. गावातील मृत व्यक्तींच्या नावाने येथे झाड लावले जाते, त्याचे संगोपन केले जाते.
पावसाचे पाणी अडवण्यासाठी पाझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततळी घेतली. श्रमदानातून लावलेली झाडे आता खूप मोठी आणि हिरवीगार झाली आहेत. पाणी अडवा- पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरित्या राबवल्याने जलस्त्रोतांची पाण्याची पातळीतही वाढ झाली. गावात सुमारे ३००पेक्षा जास्त विहिरी आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याने तळाला गेलेल्या विहिरी नितळ पाण्याने भरून गेल्या. पाझर तलाव, शेततळी भरून वाहू लागली. गावात पाणी आले तसे समृद्धी आली आणि यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारली.
गावचा पाणी प्रश्न सुटला तसा गावकऱ्यांनी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेती प्रश्नाच्या सोडवणुकीकडे मोर्चा वळवला. मतभेद विसरून गाव पोपटराव पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले. गावात सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून काहींनी सेंद्रीय शेती केली. त्याचा लाभ पाहून गावातील इतर शेतकरीही सेंद्रीय शेतीकडे वळाले. पाण्यानुसार खरीपाच्या आणि रब्बीच्या पिकांचे नियोजन ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. नियोजनानुसार पिके घेतल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे उत्पन्न वाढले.
गावातील दरडोई वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या आसपास आहे. गावात एकही बेरोजगार नाही किंवा एकही माणूस गावातून स्थलांतरित होत नाही. पोपटराव पवार गावचे सरपंच झाले. गावात माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्नासह गाव विकासाचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला. शेतीपूरक व्यवसाय हवा या भावनेतून गावात दुग्धव्यवसायाला चालना देण्यात आली. गावात दुध डेअरीची स्थापना करण्यात आली. चार-पाच चारा डेपो तयार करण्यात आले. त्यामुळे गावातील जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला. जनावरांची संख्या वाढली. गावातील दुध उत्पादन वाढले.
ग्रामस्थांमध्ये आत्मियता वाढली. असे ठराव ग्रामसभेत मांडले गेले आणि ते जसे मंजूर झाले तसेच सगळ्यांनी त्याचे पालनही केले. गावात विवाहापूर्वी मुला-मुलींची एच.आय.व्ही चाचणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण गावाची एकाचवेळी शेतजमीन मोजणी करण्याचं अनोख कामही गावाने केले आहे. एक गाव एक स्मशानभूमी सारखा उपक्रम राबविताना गावात गेल्या दहा वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते. गणपती किंवा नवरात्री सारखे उत्सव साजरे करताना प्रतिकात्मक छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दरवर्षी नवी मूर्ती विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत तर होतेच त्याचबरोबर जलप्रदूषणालाही आळा बसतो.
या गावात तंटा नाही की दारू नाही, गावात दारु तसेच गुटखाबंदीची १०० टक्के अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखु, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला नाही तर त्याची अंमलबजावणीही केली. ग्रामविकासाच्या सर्व कामात आणि समित्यांमध्ये महिलांचा सहभाग चांगला असून गाव, गावठाण, रस्ते, वस्त्यांची स्वच्छता यामध्ये सगळा गाव एक होऊन काम करतो. गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. त्यापासून गांडूळ तसेच कंपोस्ट खत तयार करण्यात येते. गाव पूर्ण हागणदारीमुक्त असून शौचालय गोबरगॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात आला आहे.
गावात एकही बेरोजगार नाही किंवा एकही माणूस गावातून स्थलांतरित होत नाही. सर्व घरात सांडपाण्याची व्यवस्था आहे. गावाने कपडे धुण्यासाठी ३ ठिकाणी सार्वजनिक धोबीघाट बांधले आहेत. या धोबीघाटातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी फळबागांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील पावसाचे प्रमाण मोजणे. गावातील पाण्याचा साठा मोजणे, त्यानुसार पिकांची यादी करणे. त्याचा तक्ता करणे. ही सर्व कामे शासकीय अधिकारी करीत नाहीत तर ती करतात गावच्या माध्यमिक शाळेतील मुलं. त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. इथली शाळा केवळ पुस्तकी शाळा नाही. येथे मुलांना जीवन, शिक्षण आणि संस्कार दिले जातात.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात ५० च्या वर नागरिक कोरोनाबाधित झाले होते. मात्र, गावात पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पाच पथके निर्माण करण्यात आली. यात आरोग्य पथकाने गावातील प्रत्येक व्यक्तींची नियमित तपासणी केली. बाधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. काहींना नगरमध्ये उपचारार्थ पाठवले. पोलिसांच्या धाकाशिवाय ग्रामस्थांनी संचारबंदी पाळत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे केवळ पंधरा दिवसात गाव कोरोनामुक्त झाले. याची दखल जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री ते थेट देशाच्या पंतप्रधानांनी घेत हिवरे बाजारचे कौतुक केले. अनेक गावांनी हिवरे बाजारकडून कोरोनामुक्तीचे मार्गदर्शन घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली.
गेल्या सुमारे ३० वर्षात गावाने आणि गावकऱ्यांनी खूप प्रगती केल्याने आता या छोट्याश्या गावात चक्क ६० करोडपती ग्रामस्थ आहेत. सन १९७२ मध्ये तर या गावात भयंकर दुष्काळ पडला होता. पण १९९० नंतर गावामध्ये एक सकारात्मक बदल होत गेला आणि समृद्ध गावाकडे याची वाटचाल सुरू झाली. या गावाला इतके समृद्ध करण्यात सर्वात मोठा सहभाग पोपटराव पवार यांचा होता. १९९० साली या गावात ९० विहिरी होत्या, आज याच गावात तब्बल ३०० विहिरी आढळून येतील. पण पाणी बचत करून योग्य व कमी पाण्याच्या शेतकऱ्यांनी पिकांची लागवड सुरू केली. त्यामुळे पोपटराव यांच्या या कार्याची आणि हिवरे बाजार या गावाच्या प्रगतीची अनेकांनी प्रशंसा केली होती.
गावाला मिळालेले पुरस्कार :
या गावाला केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यात
महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार,
महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार,
भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार,
भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार,
भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार आदी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गावाची दखल घेतली आहे.
पोपटराव यांच्या या कार्यानंतर अशी आणखीन १०० गावं समृद्ध करण्यासाठी त्यांना एका उपक्रमात सहभागीदेखील करून घेतले. पोपटराव पवार यांना २०२१ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला होता.
This Village has 60 Carorepatis Success Story