इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय लोकशाहीत निवडणूक यंत्रणेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सहाजिकच निवडणुकीत प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार असून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. सध्या देशातील पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या असून यामध्ये उत्तराखंडचा समावेश आहे. परंतु हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या राज्यातील काही भाग अत्यंत दुर्मिळ व दुर्गम असून भारत-चीन सीमेलगत आहे. येथे सध्या प्रचंड बर्फ वृष्टी होत असून मतदान केंद्र तयार करणे आणि मतदान यंत्रणा कार्यरत करणे देखील अत्यंत कठीण काम ठरते.
भारत-चीन सीमेवर बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांना हेलिकॉप्टरने मतदानासाठी आणले जाणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने जोरदार बर्फवृष्टीमुळे हा निर्णय घेतला आहे. सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यातील मुनसियारी येथे ३४०० मीटर उंचीवर मिलम-लास्पा येथे भारत-चीन सीमेला जोडणारा रस्ता बांधण्यात मोठ्या संख्येने कामगार गुंतले आहेत. मुनसियारीपासून ५४ किमी अंतरावर असलेल्या लास्पामध्ये सहा फुटांपेक्षा जास्त बर्फ पडला आहे. मतदानाच्या तारखेपर्यंतही बर्फाच्छादित पदपथ खुले होण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्थानिक मजुरांना मतदानासाठी हेलिकॉप्टरने सखल भागात आणले जाणार आहे. आतापर्यंत अशा शेकडो मतदारांची ओळख पटली आहे.
उत्तरकाशीतील बीआरओचे मेजर व्हीएस वीणू यांनी सांगितले की, येथे सुमारे ३५०० मजूर काम करत आहेत. मात्र बहुतांश मार्ग खुले आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कामगारांना सुटी देण्यात येणार आहे. आम्ही मतदानासाठी उंच भागात काम करणाऱ्या लोकांना हेलिकॉप्टरची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही असे आणखी मतदार आल्यास त्यांना हेलिकॉप्टरने मतदान केंद्रांवर नेले जाईल, असेही ते म्हणाले.