इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची शंकराचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सातही दशनामी संन्यासी आखाड्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. देशभरातील कोणत्याही पिठाच्या शंकराचार्यांच्या नियुक्ती संदर्भात एक नियमावली असते, या नियमावलीचे पालन करण्यात आले नसल्याचे या आखाड्यांनी म्हटले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे आणि द्वारकेच्या शारदा पीठाचे व उत्तराखंडच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे शिष्य अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिषपीठाचे नवे शंकराचार्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या शंकराचार्यपदी नियुक्ती केल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सातही दशनामी संन्यासी आखाड्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांची ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणून अधिकृत मान्यता स्वीकारण्यास नकार दिला आहे.
निरंजनी आखाडय़ाचे सचिव आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले की, अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य म्हणून घोषित करणे नियमबाह्य आहे. कारण शंकराचार्यपदी नियुक्तीची एक प्रक्रिया असून सर्व संन्यासी आखाड्यांच्या संमतीनंतर काशी विद्यालय परिषद ही शंकराचार्य पदाची निवड करते.
श्रीक्षेत्र काशी मध्ये अविमुक्तेश्वरानंद यांची भेट स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात शिक्षण घेऊन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली. त्याद्वारे ते त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर ते उमाशंकर पांडेंचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद झाले. मात्र आता संन्यासी आखाड्याने स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर स्वामी अविमुक्तेश्वर यांना ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच नवीन शंकराचार्यांच्या नियुक्तीची रणनीती आखण्यासाठी सातही आखाड्यांची लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Swami Avimukteshvaranand Shankaracharya Appointment Controversy