नवी दिल्ली – नवीन कार घेतल्यानंतर कारमध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण थेट कार निर्माता कंपनीला जबाबदार ठरवू शकतो. परंतु कारचा अपघात झाल्यास त्याची दुरुस्तीत निष्काळजीपणा करणारे डिलर किंवा सर्व्हिस सेंटर जबाबदार असतात की कार निर्माता कंपनी, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
डिलर किंवा अधिकृत सर्व्हिस सेंटरने वाहन दुरुस्तीत निष्काळजीपणा केल्यास कारनिर्मात कंपनीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे.
१९९९ साली खरेदी करण्यात आलेल्या होंडा सिटी कारचा २०१० मध्ये अपघात झाला होता. त्यामध्ये कारचे नुकसान झाले होते. कारला अधिकृत सेवा केंद्रात आणण्यात आले होते. नंतर सर्व्हिस सेंटर आणि कारनिर्मात कंपनीवर निष्काळीपणाचा आरोप करून जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यात आली. परंतु कार निर्मितीमध्ये कोणतीही त्रुटी होती असे तक्रारी नमूद नसल्याने जिल्हा ग्राहक मंचाने कार निर्माता कंपनीची काहीही चूक नसल्याचे म्हटले आहे.
राज्य ग्राहक आयोगाने जिल्हा ग्राहक मंचाचा निर्णय कायम ठेवला. पण राष्ट्रीय आयोगाने हा निर्णय फिरवला आणि कारनिर्माता कंपनीलाही दोषी ठरविले. वाहन निर्माता कंपनीने ग्राहकाला नवीन कार द्यावी तसेच अडीच लाख रुपयांची भरपाई द्यावी असा निर्णय राष्ट्रीय आयोगाने दिला. ग्राहकाला नवीन कार दिल्यास निर्माता कंपनीची प्रतिष्ठा वाढेल, असे राष्ट्रीय आयोगाने म्हटले होते. परंतु ग्राहकाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायाधीश यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले, की जर कारनिर्मितीमध्ये कोणतीही त्रुटी नाहीय, तर कारनिर्मात्यांना कसे जबाबदार धरले जाऊ शकते. जिल्हा आणि राज्य ग्राहक मंचांचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविले. कारची दुरुस्ती करणार्या डिलर आणि सर्व्हिस सेंटरला त्यांनी जबाबदार ठरविले होते.