श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला:
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१६:
वन्दे मातरम्
श्रीअरविंद घोष ज्या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक होते, ते ‘वंदे मातरम्’ हे नव्यानेच उदयाला आलेले नियतकालिक आपल्या पक्षाने हाती घ्यावे आणि त्याला पक्षाचे मुखपत्र या नात्याने वित्त पुरवावे यासाठी त्यांनी पक्षाचे मन वळविले होते. इ. सन १९०७ पासून ते बंद होईपर्यंत, म्हणजे इ. सन १९०८ मध्ये श्रीअरविंदांना कारावास होईपर्यंतच्या कालावधीमध्ये ‘वंदे मातरम्’ ला श्रीअरविंदांचे पूर्णत: मार्गदर्शन लाभले होते; ते नियतकालिक अगदी त्वरित संपूर्ण भारतवर्षामध्ये वितरित होत असे…
या अगदी थोड्या पण संस्मरणीय अशा कार्यकालामध्ये त्या पत्राने भारताच्या राजकीय विचारसरणीमध्ये पूर्णत: परिवर्तन घडवून आणले, ते भावी काळाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते तरीही ते दीर्घकाळ टिकून राहिले नाही; कारण अशा प्रकारच्या धाडसी कार्यक्रमासाठी देश अजूनही परिपक्व झालेला नव्हता.
संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य
हिंदुस्थानातील राजकीय कृतिकार्यक्रमाचे ध्येय ‘संपूर्ण आणि निरपवाद स्वातंत्र्य’ हे आहे याचा उघडपणे जाहीर उद्घोष करणे आणि सातत्याने वृत्तपत्रांच्या पानापानांमधून त्यावर जोर देत राहणे हा तेव्हा श्रीअरविंद घोष यांच्या आस्थेचा पहिला विषय होता; अशा प्रकारचा जाहीर उद्घोष करण्याचे धाडस असणारे हिंदुस्थानातील पहिले राजकीय नेते म्हणजे श्रीअरविंद होत आणि लगेचच ते यामध्ये यशस्वीही झाले.
पक्षाने संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय व्यक्त करण्यासाठी म्हणून ‘स्वराज्य’ हा शब्द योजला आणि अल्पावधीतच तो सर्वदूर पसरला. परंतु बऱ्याच नंतर, म्हणजे लाहोर येथील अधिवेशनामध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाची पुनर्रचना झाली, राष्ट्रीय नेतृत्वाखाली पक्षाचे पुनरुज्जीवन झाले तेव्हा मग काँग्रेसनेही ते आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले. राष्ट्रीय पक्षाचा कृतिकार्यक्रम म्हणून एकंदर देशासाठीचाच नवीन राजकीय कृतिकार्यक्रम विकसित करून, वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहीर केला गेला. असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि लोकप्रिय लवादामार्फत कायद्याच्या अखत्यारीतील खटल्यांची सोडवणूक या व यासारख्या गोष्टी श्रीअरविंदांच्या योजनेप्रमाणे चालल्या होत्या.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part16