अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आमरण उपोषणाबाबत आज अंतिम निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यास हजारे यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच आमरण उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. मात्र, राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी आज अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. त्यांनी अण्णांशी सविस्तरपणे चर्चा केली. राज्य सरकारचा हा निर्णय त्वरीत लागू होणार नाही. या प्रस्तावावर राज्य सरकारकडून हरकती आणि सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे आपण उपोषण करु नये, अशी विनंती वल्सा नायर सिंग यांनी केली. तसेच, राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीनेही एक ठराव केला. अण्णांचे वय लक्षात घेता त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, असा ठराव करण्यात आला. या दोन्ही बाबी लक्षात घेत अण्णांनी त्यांचे आमरण उपोषण स्थगित केले आहे. अण्णांच्या उपोषण घोषणेबाबत आज राळेगणसिद्धीत विशेष ग्रामसभा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, अण्णा हजारे म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या राज्यात जगण्याची मला इच्छा राहिलेली नाही. जनतेची भूमिका समजून घेणे आणि त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेणे आवश्यत आहे. त्यालाच लोकशाही म्हणतात. एकतर्फी निर्णय घेणे म्हणजे हुकूमशाहीच, असल्याचे आण्णांनी स्पष्ट केले. तसेच, राज्य सरकारने या प्रस्तावावर हरकती, सूचना मागवाव्यात. त्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा. तसे न केल्यास मी आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.