सिन्नर – तालु्क्यातील शहा गावातील १३२ केव्हीच्या वीजकेंद्रातून ९ वीजउपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्हीचा वीजभार वाहून नेणाऱ्या तारांसह विजेचे खांब लवकरात लवकर उभे करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली होती.त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यासाठी महानिर्मितीकडून १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील वीजेचा प्रश्न सोडवण्यासाठी शहा येथे १३२ केव्हीचे वीजकेंद्र उभारण्यात येत असून त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. तथापि, या केंद्रातून उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही ऊर्जेचा भार वाहून नेणारे वीजेचे खांब अद्याप उभे करण्यात आलेले नाही. त्यामुळे विजेचे खांब लवकर उभे केले नाही तर उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकणार नाही.त्यासाठी लवकरात लवकर हे खांब उभे करण्याचे काम सुरू करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती.त्यानुसार ऊर्जा मंत्र्यांनी महानिर्मितीस आदेश दिल्याने ९ वीजउपकेंद्रांना जोडण्यासाठी १३ कोटी ५४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल,असा अंदाज आहे.
१०८ किमीची लाईन..
शहा येथील वीजकेंद्रातून जवळचे वीज केंद्र लवकर जोडून सिन्नरच्या केंद्रावरील भार कमी करण्यात येणार आहे.त्यामुळे शहा व देवपूर ही केंद्रे लवकर जोडली जातील.त्यानंतर वावी व पाथरे केंद्रे जोडल्यानंतर सोमठाणे व वडांगळी केंद्रे जोडली जातील.कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, चासनळी व रांजणगाव(पोहेगाव) यातील जवळची वीजकेंद्रे अगोदर जोडली जातील.यासाठी एकूण १०८ किमी लांबीच्या वीजवाहिन्या असून त्यापैकी सिन्नर तालुक्यात ६२ किमी लांबीचे अंतर आहे.
आर्थिक अडचणीतही आमदार कोकाटेंच्या मागणीस यश …
सध्या ऊर्जा विभाग प्रचंड आर्थिक संकटातून जात असतांना मुख्य वीजकेंद्रातून उपवीजकेंद्रांना वीज पुरवठा करण्यासाठी अंतर्गत वाहिन्या उभ्या करण्यासाठी निधी मिळण्याची शक्यता फार कमी होती.मात्र आमदार कोकाटे यांनी ऊर्जामंत्र्यांना अंतर्गत वाहिन्यांचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी साकडे घातल्याने ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जा विभागास तात्काळ निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश देऊन आमदार कोकाटे यांची मागणी मान्य केली. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची विजेची मोठी समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.