मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गामसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे. लता दीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी मुंबईत येऊन लता दीदींचे दर्शन घेणार आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आज सकाळी ९.३० वाजता त्यांचे निधन झाले. येथील ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने आगामी दोन दिवस देशात कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. लता दीदींचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटले जाणार असून आज सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.