नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राज्यातील राजकारणही तापले आहे. यासंदर्भात आता गायिका अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत. आज त्या एका कार्यक्रमानिमित्त नाशकात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप होत आहे यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यात अगोदर सारखं गुंडाराज राहिलेलं नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते होत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात त्या स्त्रीला जास्त ठावूक आहे की तिथे काय झाले. त्यामुळेच त्या महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसारच गुन्हा दाखल झाला आहे. खोटे गुन्हे दाखल व्हायला हे काही आघाडी सरकार नाही. आता गुंडाराज राहिलेला नाही, हेच मला सांगायचे आहे.महाराष्ट्रात आता सु सरकार आहे. लोकशाहीत प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी आहे. आव्हाड यांना वाटत असेल अन्याय झाला आहे तर त्यांनी संबंधित अथॉरिटीकडे जाऊन तक्रार करावी, असे त्या म्हणाल्या.
भारत जोडो यात्रा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, जसे आपल्याला चांगले सत्ताधारी गरजेचे आहेत तसेच विरोधक देखील गरजेचे आहेत. ते चांगलं काम करत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
फडणवीस पुरणपोळी ऐवजी हे खातात
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की त्यांना पुरणपोळी प्रचंड आवडते. त्यामुळेच ते मोठ्या संख्येने पुरणपोळी खातात. यासंदर्भात अमृता यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ते आता पुरणपोळी खात नाहीत. ते आता मोदक आणि डार्क चॉकलेट खातात. ते त्यांना खुप आवडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Singer Amruta Fadanvis on Jitendra Awhad Issue