मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वीच्या सरकारने नेत्यांचे फोन टॅप केले होते. आत्ताच्या सरकारवर तर मुळीच विश्वास नाही. त्यामुळे सांभाळून राहा आणि शक्य होत असल्यास आयफोन घ्या, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांना नेत्यांचे फोन टॅप करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आपण सतर्क झालो आहोत. मुख्य नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने हा प्रकार केला होता. हे चुकीचे असले तरीही आपण घाबरण्याचे कारण नाही, असे दानवे म्हणाले. विशेष म्हणजे दावने यांनी यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना कुठेही काहीही बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. चारचौघात बोलताना आपण काळजी घेत नाही. जबाबदारीने वागलं पाहिजे. चार लोकांमध्ये बोलताना उलटसुलट शब्द निघतात. त्याचीच जास्त चर्चा केली जाते. त्यामुळे यापुढे काळजी घ्या आणि शक्य झालच तर आयफोन वापरा, असे दानवे म्हणाले.
दानवे यांनी थेट आयफोन घेण्याचा सल्ला दिल्यामुळे सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांच्या आणि विशेषतः छोट्या शहरांमधील पदाधिकाऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. पण साहेब म्हणतात म्हणून विचार करायला हरकत नाही, अशी चर्चा आता पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
प्रत्येकाने घेतलाच पाहिजे असे नाही
आयफोन घ्या म्हटल्यावर प्रत्येकाने घेतलाच पाहिजे असे नाही. अगदी खेड्यापाड्यांमधील पदाधिकाऱ्यांनी आयफोन घेणे आवश्यक नाही. ज्याला शक्य असेल त्यानेच घेतला पाहिजे. काहींकडे तर स्मार्टफोनही नसतील. त्यामुळे ज्या पदाधिकाऱ्यांकडे प्रमुख जबाबदाऱ्या आहेत त्यांनी तर अवश्य काळजी घेतली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
केसरकरांचा टोला
आयफोन घ्यायला सांगितला म्हणजे जनतेपुढे चुकीचा संदेश जाऊ शकतो. अर्थात कार्यकर्ते श्रीमंत झाले असतील तर परवडेल. पण आम्ही शिवसेनेत आलो तेव्हा वडापाव खाऊन दिवस काढलेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेसाठी काम केलं आहे, त्यामुळे आयफोनवर बोलू शकत नाही, असा टोला दीपक केसरकर यांनी दानवेंना लगावला आहे.
Shivsena Thackeray Group iPhone Use Politics