मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे दिसून येत आहे. आता तर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय गजानन कीर्तिकर यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणार ठरला आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार राजन साळवीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज रत्नागिरी येथे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदारसंघातील विविध कामांसाठी राजन साळवी यांनी उदय सामंतांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी, आमदार साळवी आणि उदय सामंत यांच्यात अशी अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आपण ठाकरे गटातच राहणार असून शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याची भूमिका साळवी यांनी घेतली होती. त्यानंतर आमदार साळवी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध कार्यक्रम आणि बैठकीतही दिसले. पण उदय सामंत यांच्याशी साळवींनी अचानक भेट घेतल्याने ते शिंदे गटात जाणार असा अंदाज लावला जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चाललेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीवेळी तब्बल ४० आमदार फोडले होते. त्यामुळे ठाकरे गटाकडे १५ आमदार शिल्लक राहिले. त्यात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांचाही समावेश आहे. आता राजन साळवी हे शिंदे गटात गेले तर ठाकरे गटाकडे आदित्य यांच्यासह केवळ १४ आमदार शिल्लक राहणार आहेत. म्हणजे आदित्य वगळता १३ आमदार असतील. त्यातही कोकणामध्ये ठाकरे गटाचा एकही आमदार राहणार नाही.
Shivsena Politics Rebel MLA Shinde Group Thackeray