मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना ताब्यात घेण्याचे जोराचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. एकनाथ शिंदे हे हिंगोली व नांदेड दौऱ्यावर असताना दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, अनेक तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांसह पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले होते आहे. त्यामुळे शिंदे नांदेड-हिंगोली दौऱ्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता उद्धव यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे, निष्ठावंत म्हणून उद्धव यांनी ज्या नेत्याची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली तोच आता शिंदे गटात दाखल झाला आहे.
बंडखोर आमदारानंतर पक्ष संघटन आणि पक्ष उभारणीचा प्रयत्न खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे करीत आहेत. आमदारांपासून सुरु झालेले बंडाचे लोण स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. असे असतानाही पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती केली जात आहे. त्याच पद्धतीने नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यापुर्वी खासदार हेमंत पाटील यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेच्या दोन विद्यमान जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसेनेच्या विविध विभागाचे पदाधिकारी गटात सहभागी होणार आहेत.
खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी हा प्रवेश केला आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेचे संघटन उभे केले जात आहे तिथे देखील त्याला छेद देण्याचे काम आता शिंदे गटाकडून होत असल्याचे समोर येत आहे. हेमंत पाटील हे हिंगोली मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवाय आमदार संतोष बांगर हे देखील शिंदे गटातच आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर संघटन उभे रहावे या दृष्टीकोनातून आनंद जाधव यांची बीड, नांदेड आणि हिंगोलीच्या संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली होती.
याशिवाय त्यांना ज्या मुंबईतून निवडीचे पत्र शिवसेनेकडून देण्यात आले होते त्याच मुंबईत येऊन त्यांनी व त्यांच्या बरोबर बारा तालुकाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नांदेड जिल्ह्यातील 400 ते 500 पदाधिकारी घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत शक्तीप्रदर्शन करीत हा प्रवेश केला आहे. मात्र, मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवत अतिवृष्टी भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले केवळ आश्वासनच नाहीतर थेट मदतीचे स्वरुपही बदलले आहे. त्यांचे हे कार्य पाहून प्रभावित झालेले जाधव थेट शिंदे गटात सामील झाले आहेत. मुंबई येथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत अद्यापही सुनावणी सुरु आहे. मात्र, शिवसेनेला शोभेल असे काम राज्यात सुरु आहे. शिवसेना आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोग जो निर्णय देईल तो आपणास मान्य असेल असे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय विरोधकांनी चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार न टाकता शिंदे सरकारच्या कामाचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे शिंदे गटात सामील झाले होते.
Shivsena Politics Leader Rebel Shinde Group