मुंबई – अयोध्येत शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचे सांगत भारतीय जनता युवा मोर्चाने आज शिवसेना भवनावर मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही येथे जमले, त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या गोंधळामुळे अखेर पोलिसांना हस्तक्षेप केला. पण, त्यानंतरही दोन्ही पक्षातील आरोप – प्रत्यारोप सुरुच होते. या गोंधळानंतर भाजपचे कार्यकर्ते व नेते माहिम पोलिस स्टेशनला जमा झाले असून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. भाजपने शिवसैनिकांनी भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आऱोप केला आहे.
शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने फटकार मोर्चा आयोजित केला होता. येथेच हा गोंधळ झाला आहे. या गोंधळानंतर दोन्ही पक्षांकडून आरोप – प्रत्योरोप सुरु झाले आहे.
या गोंधळाबाबत शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी सांगितले की, भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, कुणीही महिलांवर हल्ला केलेला नाही. पोलिस तेथे उपस्थित होते. जर शिवसेना भवनावर कुणी दगड धोंडे घेऊन येत असेल तर आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असेही सांगितले. शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा भाजपचा प्लान असल्याचेही ते म्हणाले, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, याप्रकरणी चौकशी करुन संबधितावर कारवाई करावी असे सांगितले तर भाजपचे आशिष शेलातर यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवल्याचे म्हटले आहे.