नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आज नाराजीचे जबरदस्त फटाके फोडले आहेत. शिंदे गटाच्या कारभारावरच त्यांनी थेट संशय व्यक्त केला आहे. तसेच, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला जबर फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खुद्द शिंदे गटाच्या आमदारानेच असे आरोप आणि दावे केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच, शिंदे गटाच्या कारभाराबाबत राज्यभरामध्ये चर्चा रंगत आहे.
पालकमंत्र्यांवर आरोप
नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सर्वप्रथम त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात मला विश्वासात घेतलं जात नाही. पालकमंत्र्यांच्या बैठकांना मला बोलावलं जात नाही. याधीचे पालकमंत्री छगन भुजबळ हे बैठकांना बोलवायचे, मात्र आताच्या पालकमंत्र्यांच्या (दादा भुसे) बैठकीला आमंत्रण दिलं जात नाही, असे कांदे म्हणाले. विशेष म्हणजे, विकासकामांवरुन कांदे यांनी भुजबळांशी पंगा घेतला होता. आता कांदे यांनी भुसे यांच्यावरही नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे गटाचा कारभार कसा आहे
सुहास कांदे म्हणाले की, मी मरेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांच्यावरील प्रेमापोटीच मी त्यांच्यासोबत आहे. माझ्या भावना आणि मते मी त्यांच्यापर्यंत पोहचविल्या आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात पक्षाचे जे कामकाज सुरू आहे ते अयोग्य पद्धतीने सुरू आहे. केवळ विकासच नाही तर पक्षाच्याही कुठल्याही कामात सहभागी केलं जात नाही. सध्या जिल्ह्यात नेमलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सध्या नेमलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष थांबला असल्याचा आरोप त्यांनी केला.
खासदार गोडसेंवर निशाणा
कांदे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात चुकीचे पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात पक्षाचे कार्यालय सुरू झाले हे देखील मला माहीत नाही, असे कांदेंनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या महिन्यात शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे कार्यालय खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालया लगत आहे. त्यामुळे कांदे यांची खासदार गोडसे यांच्यावरही मोठी नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
आगामी निवडणुकात मोठा फटका
सुहास कांदे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही तयारी केली जात नाही, हे दुर्दैव आहे. पदाधिकाऱ्यांची निवड चुकीची आहे. पदाधिकारी निवड करतांना मला आणि पालकमंत्र्यांना डावलले आहे. आम्हाला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या. चुकीच्या पदाधिकाऱ्यांमुळे शिंदे गटाला फटका बसणार आहे.
म्हणून पक्षातील इन्कमिंग बंद झाले
सुहास कांदे म्हणाले की, अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. अन्य पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. शिंदे गटात अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील सध्याच्या पदाधिकाऱ्यांमुळे अनेक जण पक्षात यायला तयार नाहीत. माझा मान, अपमान झाला तरी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार आहे. मला तिकीट मिळाले नाही, तरी शिंदेंच्या सोबत राहिन, असे कांदेंनी स्पष्ट केलेय
एकनाथ शिंदेंकडून ही अपेक्षा
सुहास कांदे म्हणाले की, मी कुणालाही घाबरत नाही. जातानाही मातोश्रीला सांगून शिंदेंसोबत गेलो. गजानन किर्तीकर मोठे नेते आहेत. त्यांच्यावर देखील अन्याय झाला. त्यामुळेच ते शिंदे गटात आले आहेत. काही दिवसांनी त्यांचा मुलगाही शिंदे गटात येईल. मी अन्याय सहन करणारा नाही. त्यामुळेच स्पष्ट बोलतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाचा धडका लावला आहे. अनेक लोकांची मानसिकता त्यामुळे बदलते आहे. पक्ष वाढताना दिसतो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी दररोज १ तास वेळ द्यावा, अशी अपेक्षा कांदे यांनी व्यक्त केली.
Shinde Group MLA Suhas Kande Politics Party Work Culture