मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील धूसफूस अधून मधून समोर येत आहे. आता सरकारी योजनेवरुन दोघांमध्ये वादविवाद सुरू आहे. शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी मात्र ही थाळी बंद करण्यास विरोध दर्शवला असून, ही योजना सुरुच ठेवावी असा आग्रह धरणार असल्याचे सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात गरजूंना पोटभर जेवण मिळावे म्हणून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. या योजनेस चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता मात्र ही थाळी बंद करण्याच्या चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील ४० आमदार उद्धव ठाकरे सरकारचा भाग होते. त्यावेळी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवभोजन थाळीची केंद्र मिळाली होती. त्यामुळे योजना सुरु रहावी असे मत या आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. योजना बंद करणे योग्य होणार नाही. योजनेत ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करुन शिवभोजन थाळी सुरु ठेवली पाहिजे, असे शिंदे गटाच्या आमदारांचे म्हणणे आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना या थाळीचे केंद्र मिळाले होते. भाजप कार्यकर्त्यांना मात्र या योजनेपासून सरकारमध्ये नसल्याने वंचित रहावे लागले होते. त्यामुळे ही योजना आता बंद होईल, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, ही योजना बंद करुन गोरगरिबांच्या जेवणासाठी नवीन योजना आणायची आणि त्यानिमित्ताने भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संस्थांना ही केंद्र देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे म्हणले जाते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपले खाते या योजनेचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Shinde Group BJP Politics Controversy Scheme