मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सत्तांतरानंतर नवीन सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारने अवघ्या 7 महिन्याच्या कार्यकाळात जाहिरातींवर मोठा खर्च केल्याचे समोर आले आहे. जाहिरातबाजीवर शासनाच्या तिजोरीतून तब्बल 42 कोटी 44 लाख रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती. त्यानुसार ही आकडेवारी उपलब्ध करू देण्यात आली आहे. 7 महिन्यात 42.44 लाखांचा खर्च म्हणजेच सरासरी दर दिवसाला जवळपास 19 लाख 74 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. ही जनतेच्या खिशातील शासकीय पैशाची वारेमाप उधळपट्टी असल्याचे नितीन यादव यांनी म्हणले आहे.
हर घर तिरंगा उपक्रमावर 10 कोटींचा खर्च
सर्वात जास्त खर्च हर घर तिरंगा या उपक्रमावर करण्यात आल्याचे दिसते. हर घर तिरंगा उपक्रमासाठी 10 कोटी 61 लाख 568 रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्राचा उपक्रम असलेल्या बूस्टर डोसच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी 86 लाख 70 हजार 344 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी 4 कोटी 72 लाख 58 हजार 148 रुपये खर्च करण्यात आल्याचं माहिती अधिकारातून समोर आले आहे.
जी-20 च्या प्रसिद्धीसाठी 85 लाख
जी 20 च्या प्रसिद्धीवर 85 लाख 16 हजार 592 रुपये तर इंडियन सायन्स काँग्रेसच्या प्रसिद्धीसाठी 2 कोटी 37 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांच्या प्रसिद्धीसाठी 7 कोटी 57 लाख 45 हजारांचा खर्च करण्यात आला आहे तर MMRDA च्या जाहिरातींसाठी 1 कोटी 13 लाख 47 हजार 200 रुपये खर्च करण्यात आले आहेत. मरारवि महामंडळाच्या प्रसिद्धीवर 11.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी 96 लाख 40 हजार 680 रुपये खर्च करण्यात आला असल्याचे दिसते.
Shinde Fadnavis Government Crore Expenses on Advertisements