मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीचा राजकीय गोंधळ वाढतच आहे. शिवबंधन बांधल्यानंतर पाठिंबा देणार असल्याचा निरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती नेमका कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या गोंधळावर आता राजकीय विश्लेषक आगामी निवडणुकांमधील राजकीय गणिते मांडत आहेत. संभाजीराजे यांना उमेदवारी देणाऱ्या आणि न देणाऱ्या पक्षांच्या भवितव्याबद्दलही राजकीय पंडित आपली मते व्यक्त करत आहेत.
संभाजीराजे अपक्ष लढले तर पाठिंबा देऊ, असे आश्वासन भाजपने दिले आहे. परंतु संभाजीराजे यांना विजय मिळतील इतकी मते भाजपकडे नाहीत. शिवसेनेकडे तेवढी मते आहेत. परंतु शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर संभाजीराजेंना अमान्य आहे. संभाजीराजे अपक्ष लढून पराभूत झाल्यास शिवेसनेला फटका बसण्याचा कयास विश्लेषकांकडून लावला जात आहे. कारण राज्यातील मराठा समाजाचा मोठा वर्ग संभाजीराजे यांच्या पाठिशी उभा आहे. त्यांचा पराभव झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाज शिवसेनेकडे पाठ फिरवू शकतो, असे त्यांना वाटते.
संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारल्यास छत्रपतींच्या घराण्याला डावलल्यावरून शिवसेनेविरुद्ध रोष निर्माण होऊ शकतो. विरोधकांनाही नवा मुद्दा मिळून त्याचा राजकीय वापर शिवसेनेविरोधात केला जाऊ शकतो. संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. राज्यभरात पक्ष वाढवून ते शिवसेनेची कोंडी करू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे नुकसान होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.
संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही आणि नंतर ते निवडणुकीत पडले तर मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटू शकतात. मराठा समाजाच्या आरक्षाणाचे हत्यार पुन्हा उपसले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारला कोंडीत पकण्यासाठी राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणाचा भडका उडू शकतो. याचा शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढे विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.