इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय रेल्वे मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. परंतु काही वेळा रेल्वेमध्ये अनेक घात-अपघात घडत असतात. इतकेच नव्हे तर चोऱ्या आणि दरोडे या सारखे प्रकार देखील घडून येतात. यांना आळा घालण्यासाठी रेल्वे विभागाने रेल्वे सुरक्षा दल तैनात केले आहे, त्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसतो. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रात्रंदिवस प्रवाशांची काळजी घेण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतात. तसेच काही चोरीच्या घटना घडल्या तर त्या ठिकाणी धावून जातात. रेल्वे सुरक्षा दलाच्या हवालदाराने शौर्य दाखवत, रेल्वेतील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका बदमाशाला पकडले.
विशेष म्हणजे चालत्या ट्रेनमधून उडी मारून हा बदमाश पळत होता, त्याला पोलिसांनी 500 मीटरपर्यंत पाठलाग करून पकडले. दिल्ली सराय रोहिल्ला स्टेशनवर ही घटना घडली. ट्रेन क्रमांक १४३१२ अला हजरत एक्सप्रेस रेवाडीहून दिल्लीच्या दिशेने येत होती. सदर ट्रेन सराई रोहिला स्थानकाजवळील झोपडपट्टीजवळून जात असताना, धावत्या ट्रेनच्या S-9 कोचमध्ये एक चोरट्याने धिंगाणा घातला. गेटजवळील सीटवर बसलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि पळू लागला. त्याचवेळी ही घटना पाहून ट्रेनमध्ये तैनात आरपीएफ कॉन्स्टेबल सबरमलनेही चालत्या ट्रेनमधून उडी मारली. सबरमल यांनी 500 मीटरपर्यंत पाठलाग करून त्याला पकडले. सदर चोरटा हा सराई रोहिला झोपडपट्टीत राहतो. तपासादरम्यान आरोपी दोन दिवसांपूर्वी तिहार तुरुंगातून बाहेर आल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.