नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यराणी आणि पंचवटी या दोन्ही गाड्या सुपरफास्ट असूनही मुंबईला कधीच वेळेत पोहचत नाही. परिणामी चाकरमान्यांना वेळेत कार्यालयात पोहोचता येत नाही. लेटमार्क लागल्याने अनेकांच्या पगारात कपात होऊन चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पंचवटी एक्सप्रेसमधील महिलांचा डबा अलीकडे कमी केल्याने महिलांची मोठी कुंचबना होत आहे. काही अपवृत्ती मासिक पासधारकांच्या डब्यात बळजबरीने बसत असल्याने सतत वादविवाद होतात. अशा एक ना अनेक व्यथा मांडत या सर्व समस्यांतून प्रवाशांची सुटका करावी असे साकडे रोज नाशिक – मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी खा.गोडसे यांना घातले. चाकरमान्यांच्या व्यथा ऐकून घेत खा. गोडसे यांनी थेट रेल्वेच्या जीएम यांना फोन करत चाकरमान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या.
चाकरमान्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी खा. गोडसे यांनी मुंबई ते नाशिकरोड या दरम्यानचा प्रवास पंचवटी एक्सप्रेसने केला. खासदार गोडसे यांनी रेल्वे डब्यात प्रवेश करताच चाकरमान्यांना खूप आनंद झाला. प्रवासादरम्यान असंख्य चाकरमान्यांनी खा.गोडसे यांच्याशी संवाद करत आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या कथन केल्या. दिवसेंदिवस चाकरमान्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्या तुलनेने गाड्यांच्या संख्येत मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. उलटपक्षी पंचवटी एक्सप्रेसमधील महिलांचा डबा अलिकडे रद्द करण्यात आला असून यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुंचबना होत असल्याचे यावेळी प्रवाशांनी खा.गोडसे यांच्या लक्षात आणून दिले.
पंचवटी आणि राज्यराणी या रेल्वे गाडया नाशिक येथील चाकरमान्यांसाठी एक वरदानच आहे. मुंबईतील आपल्या कार्यालयात वेळेवर पोहचण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इतर रेल्वेगाड्या पुढे काढण्यासाठी प्रशासन पंचवटी आणि राज्यराणी या रेल्वेगाडयांना साईड टॅक करतात. यामुळे वरील दोनही रेल्वेगाड्या रोजच उशिराने मुंबईत पोहचतात. या मानवनिर्मित चुकीमुळे सर्वच चाकरमाने उशिराने कामावर पोहोचतात. रोजच लेटमार्क लागून पगारात कपात होत असून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने चाकरमान्यांनी खा.गोडसे यांना सांगत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. वरील दोनही रेल्वेगाड्यांना सुपरफास्टचा दर्जा असतांनाही गाडया उशिराने का धावतात असा सवाल चाकरमान्यांनी उपस्थित केला.
अनेक अपवृत्तीचे प्रवाशी थेट मासिक पासधारकांच्या डब्यात घुसून अरेरावी करत असल्याचे यावेळी अनेकांनी खा. गोडसे यांच्या लक्षात आणून दिले. नाशिककरांना त्यांच्या हक्काच्या रेल्वेगाडया उपलब्ध होणेसाठी नाशिकरोड रेल्वेस्थानक येथे टर्मिनल होणे अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका यावेळी अनेकांनी मांडली. चाकरमान्यांकडून व्यक्त करण्यात आलेल्या व्यथांची तात्काळ दखल घेत खा.गोडसे यांनी लगेचच जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांना फोन केला. चाकरमान्यांच्या समस्यांचे गांभीर्य खा. गोडसे यांनी लक्षात आणून देत तात्काळ प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना केल्या. यावेळी विवेक गायकवाड, रविंद्र सोनार, राजेंद पवार, बाबुराव जोगारे, विशाल तांबट, अतुल सोनजे, सावकार योगेश, प्रफुल्ल बच्छाव, एस.डी.देशमुख, हिरे सूहास, लोखंडे प्रविण, राजेंद्र कोलते, रमेश शिवदे आदी उपस्थित होते.
Railway Passengers Questions to MP Hemant Godse