नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेत नागपुरातील भूखंड घोटाळ्याचा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न न्यायालयात असला तरी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड अडचणीत आले आहेत. कारण, तत्कालिन नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी भूखंडाचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा सत्ताधारी सहकारी खुद्द भाजपच अडचणीत आणत असल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी दिशा सालियान मृत्यू प्रकरण बाहेर काढण्यात आले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याची माहिती देत संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला तसेच या आरोपांमागे भाजपाच्या आमदारांचा हात असल्याचाही आरोप केला.
राऊत म्हणाले की, ज्या भूखंडावरुन तत्कालीन नगरविकास मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत, तो मुद्दा खरेतर याआधी भाजपाच्याच आमदारांनी तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण लटके यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपाच्याच आमदारांनी उपस्थित केलेला तारांकित प्रश्न आम्ही यावेळी लावून धरला आहे, असे राऊत म्हणाले. इतकेच नव्हे, तर एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत एक विधान केले होते. ते म्हणाले होते की, जोपर्यंत मी प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पहायचे आहे. या विधानाच्या दोनच दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांविरोधातील हे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे खोके सरकारने विशेषतः शिंदे गटाने भाजपाचे राजकारण समजून घ्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे नागपूर न्यास भूखंड घोटाळा इतका गंभीर आहे की, यात १०० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार आहे. त्यावर आम्ही नव्हे तर न्यायालयानेच प्रश्न उपस्थित केले आहेत. लिहून देतो शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल, तुम्ही आमच्या फाइल बाहेर काढत आहात. पण आम्ही लढत राहू. एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला तुमच्या घरातल्या फाइल बाहेर निघाल्या तर त्या सेंट्रल हॉलपर्यंत जातील. शिंदे गटात सामील झालेल्यांच्या सर्व फाइल कशा बंद झाल्या? भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या आज कुठे गेलेत? त्यांना मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आज दिसत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला.
Politics Nagpur Land Scam CM Eknath Shinde BJP Strategy