मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेसाठी कितीही राजकीय नाट्य रचले गेले असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र याच सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे, असे स्पष्ट मत मुंबईत व्यक्त केले. त्यांनी शिंदे-फडणवीस यांचे ‘डबल इंजिन सरकार महाराष्ट्रासाठी लकी’ असल्याचे प्रतिपादन केले.
मुंबई येथील ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आज (गुरुवार) पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित जाहीर सभेत मोदींनी संवाद साधला. ‘आज देशातील सर्व रेल्वेस्थानकांचा विकास विमानतळाच्या धरतीवर केला जात आहे. प्रत्येक रेल्वेस्थानक अत्याधुनिक होत आहे. देशातील सर्वांत जुने रेल्वेस्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास होणार आहे,’ अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारताच्या संकल्पनांवर संपूर्ण जगाचा विश्वास असणं, हे स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडत आहे, असंही मोदी म्हणाले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, 360 खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे.
देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दिली.
रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.
आधुनिक सुविधांसाठी कटिबद्ध
देशभरातील रेल्वे व रेल्वे स्थानक विकसित करण्याच्या दृष्टीने सरकार मिशन समजून काम करत आहे. यातून मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टीव्हिटीलाही फायदा होणार आहे.डबल इंजिन सरकार आधुनिक सुविधांचा अनुभव सामान्य जनतेला देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास मोदींनी दिला.
श्रीमंतांनाच नव्हे…
पूर्वी महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात श्रीमंतांना, साधन संपन्न लोकांना विकासाच्या गतीचा लाभ आणि अनुभव मिळायचा. पण आता श्रीमंतांनाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही त्याच गतीचा अनुभव घेता येणार आहे, असंही मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार विकासाची गती कायम राखण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
आधी खूप वेळा गेला
आज भारत मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्याची क्षमता राखतो. स्वातंत्र्यानंतर हे पहिल्यांदा होत आहे. पूर्वी फक्त गरिबांची चर्चा करण्यात आणि जगाला मदत मागण्यात वेळ गेला. या मोठ्या काळाची भरपाई आज भारत करीत आहे, या शब्दांत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टिका केला.
PM Narendra Modi Mumbai Visit Speech Imp Points