केंद्रीय मंत्री भारती पवार यांना नाशिक विमानसेवेबाबत पत्र
मा. सौ. भारतीताई नमस्कार,
आपण नाशिकच्या हवाई सेवेबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि नाशिककरांच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण सर्वच बाबींची व्यवस्थित मांडणी केली, पण तरीही काही गोष्टींचा उलगडा होत नाही. तसेच आपणही आपल्या स्तरावर अद्ययावत माहिती घ्यावी म्हणून हा पत्रप्रपंच….
१) नाशिकची सेवा बंद करुन कंपनीने थेट उडाण योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. कारण, कंपनीने तीन वर्षे उडाणची सबसिडी घेतली आणि आता तत्काळ सेवा बंद केली. म्हणजेच, ही सरकारची सुद्धा फसवणूक झाली आहे. सरकारने संबंधित कंपनीवर कारवाई करणे आवश्यक आहे. तशी ती का केली जात नाही. तीन वर्षे सबसिडी घ्यायची आणि आता सेवा परवडत नाही म्हणून सेवा बंद करायची म्हणजे सरकारच्या पैशांवर हा डल्लाच आहे. हा मोठाच अपराध म्हटला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याची दखल घेऊन संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करायला हवी. कारण, असा प्रकार अन्य विमानसेवा कंपन्या पुन्हा करणार नाहीत. जर, कारवाई झाली नाही तर सरकारी पैसा लाटून विमान कंपन्या गब्बर होतील. आणि जनताही सेवेपासून वंचित राहिल. विशेष म्हणजे, याच जनतेच्या पैशातून (करातून) कंपनीला पैसा मिळालेला असेल.
२) ऐन दिवाळीच्या सुट्टीच्या आधीच सिझनमधे विमान सेवा बंद करणे, उड्डाणाच्या वेळा मुद्दाम गैरसोयीच्या ठेवणे, वेळेबाबत सारखे बदल करणे, एकाच शहरासाठी (नाशिक-अहमदाबाद) दोन-दोन विमाने लागोपाठ ठेवणे अशा बाबींमुळेही विमानसेवेस प्रतिसाद कमी होऊ शकतो. याकडेही आपले लक्ष वेधू इच्छितो. उदा. दिल्ली-नाशिक विमान पहाटे ५ वाजता असायचे. त्यासाठी पहाटे २ वाजता उठून दोन तास अगोदर म्हणजे पहाटे ३ वाजता कोण विमानतळावर जाईल. तसेच दिल्लीस जाणारे विमान रात्री ९-३० वाजता दिल्लीस पोहचायचे. म्हणजे दिल्लीत जावून हाॅटेलच्या मुक्कामाचा खर्च करायचा तर प्रवाशी शिर्डी किंवा मुंबई येथून दिवसाच्या विमानसेवेला प्राधान्य देतात. आपण स्वतः कधी पहाटे पाचच्या विमानाने दिल्ली येथून नाशिकला आलात का?
३) उडान योजनेच्या उद्देशाला हरताळ फासण्यात आल्याने ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री या नात्याने ही बाब तातडीने हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबरच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कळवायला हवी होती आणि आहे. कारण, पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतूनच उडाण योजनेचा प्रारंभ झाला आहे. त्यांच्या नेतृत्वातच ती राबविली जात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यापर्यंत या मोठ्या अपराधाची बाब न पोहचविणे म्हणजे मोठा गुन्हाच ठरेल. आणि त्यांच्यापर्यंत ही बाब नंतर पोहचली तर ते सुद्धा चुकीचे ठरेल.
४) एअर अलायन्स या कंपनीला व्यावसायिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही असे आपण नमूद केले आहे. पण प्रवाशांची एकत्रित आकडेवारी देण्यापेक्षा प्रत्येक उड्डाणाची स्वतंत्ररित्या माहिती घ्यावी म्हणजे सत्य सामोरे येईल. आपण ही माहिती घेऊ शकता व मंत्री या नात्याने आपल्याला तो अधिकार आहे. आपण तो वापरावा. जेणेकरुन खरी आकडेवारी समोर येईल. कंपनीने किती दिवस सेवा दिली, त्यातील किती दिवस अल्प प्रतिसाद होता, हे पहायला हवे. पाच दिवस संपूर्ण तिकीटे विक्री आणि एक दिवशी काही सीट शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे एकूणच प्रतिसाद कमी होता असे कसे म्हणता येईल. उडाण योजनेव्यतीरिक्त कंपनीने किती तिकीटे आणि कोणत्या दराने विक्री केली हे सुद्धा पहायला हवे. विशेष म्हणजे, अहमदाबाद किंवा पुण्याचे एक तिकीट तब्बल १० ते १२ हजार रुपयेही घेतले गेले आहेत. अशी तिकीटे मीच प्रवाशांसाठी बुक केली आहेत. असे असताना आर्थिकदृष्ट्या सेवा परवडत नाही, असे कसे म्हणता येईल.
५) जर व्यावसायिक पातळीवर सेवा बंद झाली असेल तर आपण पुढाकार घेऊन देशातील कुठल्याही प्रमुख शहरासाठी नाशिक येथून कुठल्याही प्रमुख विमान कंपनीची सेवा सुरु करावी. त्यासाठी उडाण योजनेची सबसिडी नसली तरी चालेल. ती सेवा १००% यशस्वी होईल याची मी खात्री देतो. मात्र विमानाच्या वेळा योग्य व सोयीच्या असणे गरजेचे आहे.
६) नाशिक येथून विमानसेवा सुरु व्हावी यासाठी मा.खा.हेमंत आप्पा गोडसे यांनीही भरपूर प्रयत्न आणि पत्रव्यवहार केला आहे. आपण ही पत्रकार परीषद संयुक्तरित्या घेतली असती किंवा त्यांचीही मदत घेतली असती तर अधिक चांगले झाले असते. कारण, आता ते आपले विरोधक नाहीत. तर आपल्या मित्र पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही त्यांची मदत घेणे गैर ठरले नसते. आणि या सेवेसंबंधी अधिक चांगले काम होऊ शकले असते.
७) विमान कंपन्यांनी शासनाच्या उडाण सेवेचा शासकीय लाभ घेऊन, मुदत संपल्यावर त्या कंपन्यांना परवडत नाही असे आपण सांगितले. यापेक्षा त्या विमान कंपन्यांनी शासकीय सबसिडीचा लाभ घेतला व पळून गेल्या असे म्हणणे जास्त उचित झाले असते. कारण आपण लोकप्रतिनिधी आहात. आपण सत्याची बाजू घेण्यापेक्षा आपल्या पत्रकार परीषदेत विमान कंपनीच्या बाजूनेच जास्त बोलत होतात असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. आपण केंद्रात मंत्री आहात त्यामुळे आपण त्या नात्यानेही विचार करणे आणि संबंधितांवर कारवाई करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे आपल्याकडून अपेक्षित आहे. पण, तसे होताना दिसत नाही.
८) कुठलीही विमानसेवा सुरु करणेबाबत केवळ पत्र व्यवहार करुन चालत नाही तर संबधित मंत्री महोदयांचे कार्यालयात ठिय्या देणे किंवा आग्रहपूर्वक काम करुन घेणे आवश्यक असते, असाच आजवरचा इतिहास आहे. असा पत्रव्यवहार खासदार हेमंत गोडसे यांनी भरपूर केला आहे. आपल्यापेक्षा छोटी शहरे असलेल्या शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादने हे सिद्ध केले आहे.
९) ओझर हा नाशिकचा विमानतळ सर्वात सुरक्षित विमानतळ आहे. आपला रनवे मोठा आहे. नाईट लँडिंग, हवामान, दृष्यमानता (व्हाजिबिलिटी) वर्षभर चांगले असते. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र येथून विमानसेवेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे प्रवाशांचा लोडही चांगला आहे. येथील पार्कींगची सेवाही उत्तम आहे. या सर्व बाबी इतर शहरांपेक्षा आपल्याकडे जास्त चांगल्या आहेत. तरीही नागरी उड्डाण कार्यालय कायम नाशिकवर नाराज का असते याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
१०) कुठलीही पूर्व कल्पना न देता अलायन्सने सेवा बंद करुन विमान इंदूरला वळवले (पळवले) याबाबत आपण संबधितांना जाब विचारायचा सोडून त्यांची बाजू घेता हे योग्य नाही. उलट केंद्रात मंत्री या नात्याने आणि खासकरुन आपल्या मतदारसंघातच दिंडोरी येते. त्यामुळे ही बाब आपण अधिक आक्रमकतेने घ्यायला हवी होती. पण तसे झालेले नाही.
१०) एका मुलीची बॅग विमानतळावर पोहचली नाही म्हणून संबधित कंपनीला ती बॅग घरी नेऊन द्या, असा आदेश केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. त्याचे देशभरातच कौतुक झाले. पण, नाशिकमध्ये सेवा सुरु असलेले आणि उत्तम प्रतिसाद मिळत असलेले अख्खे विमानच पळवून नेण्यात आले. त्यामुळे ते या विषयावर गप्प कसे? त्यांच्या निदर्शनास ही बाब आपण आणून देणे अगत्याचे आहे.
११) उडाण योजने अंतर्गत ज्या कंपन्यांनी नाशिक येथून इतर शहरांसाठी हवाई सेवा देण्याबाबतचे करार केले आहेत. त्या कंपन्या अजूनही सदर सेवा सुरु करत नाहीत. जसे की गोवा, बंगळुरू, सिधुंदुर्ग, हिंडन, चेन्नई या शहरांसाठी सेवा गेल्या तीन वर्षात सुरू झालेली नाही. याबाबत आपण संबधित कंपन्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. त्यांना सेवा पुरविण्यासाठी एक शेवटची मुदत द्यावी. अन्यथा ते मार्ग इतर कंपन्यांना द्यावे. जेणेकरुन नाशिकची कनेक्टिविटी वाढेल.
१२) स्टार एअर या कंपनीच्यावतीने नाशिकहून बेळगाव सेवा दिली जात होती. आता या कंपनीनेही अचानक ही सेवा बंद केली आहे. आणि याच विमानाद्वारे कोल्हापूर-मुंबई ही सेवा दिली जात आहे. म्हणजेच आपले सेवारत असलेले विमान तिकडे घेऊन गेले. आपली सेवा बंद केली आणि तिकडे सेवा सुरू करण्यात आली. ही बाब सुद्धा फसगतच आहे. शिवाय ही सेवा सुद्धा उडान योजनेअंतर्गतच आहे. त्यामुळे ही बाब सुद्धा आपण अतिशय गांभिर्याने घेणे अगत्याचे आहे.
१३) अलायन्स एअर या कंपनीला गेल्या तीन वर्षात नक्की किती नफा झाला किंवा तोटा झाला याची आकडेवारी जाहीर होणे आवश्यक आहे. कारण, त्यांना उत्तम प्रतिसाद आणि महागडे तिकीटे विकूनही कंपनी आता सेवा देण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगत आहे. ही असमर्थता त्यांच्याकडूनच आकडेवारीद्वारे सिद्ध होईल. ही आकडेवारी आपणच जनतेसमोर मांडावी, ही विनंती
१४) अलायन्स एअर या कंपनीची उडाण योजनेची मुदत संपत असल्याचे अचानक कळाले का. या मुदतीबाबत गेल्यावर्षीचे एक पत्रही समोर आले आहे. असे असताना कंपनीने नोव्हेंबर महिन्यातील म्हणजेच मुदतीनंतरची तिकीटे का विकली. त्याचे पैसे कंपनीने प्रवाशांकडून घेतले. आणि आता कंपनी हे पैसे अजूनही परत करीत नाहीय. म्हणजेच, कंपनी प्रवाशांना फसवते आहे. मग, कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे का की कंपनीला बळजबरीने नाशिक सेवा बंद करण्यास भाग पाडले आहे. या सर्वच प्रश्नांची उकल होणे आवश्यक आहे. नाशिकच्या केंद्र सरकारमधील प्रतिनिधी या नात्याने या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणच जाणून घेऊ शकतात आणि ती जनतेसमोर मांडू शकतात.
१५) २०२४ ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. स्वाभाविकपणे आपण पुन्हा ही निवडणूक लढविणार आहात. त्यामुळे या निवडणुकीचा विचारही आपण करीतच असाल. आपल्याच कार्यकाळात सेवा सुरू झाली आणि बंदही पडली तर आपल्यालाही मतदारांना ही बाब सांगणे अतिशय अवघड जाईल.
१६) नाशिकच्या विमानसेवेबाबत आपण आणि खासदार गोडसे यांनी एकत्रितरित्या पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी या क्षेत्रातील निवडक व्यक्ती वा मान्यवरांना घेऊन दिल्ली येथे संबधित मंत्रालयांची बैठक आयोजित करावी ही अपेक्षा.
कळावे
आपला
एक नाशिककर, भारतीय नागरिक आणि पर्यटन व ट्रॅव्हल या क्षेत्रातील जाणकार
Open Letter to Minister Bharti Pawar for Nashik Air Service